मविआचे जोरदार शक्तीपरीक्षण
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेतर्फे आकारण्यात येत असलेल्या मालमत्ता करा विरोधात महाविकास आघाडीतर्फे सोमवारी (दि.13 ) आयोजित केलेल्या मोर्चात पालिका हद्दीतील हजारो नागरिक सहभागी झाले होते. यामुळे या मोर्चातून घटक पक्षांनी एका प्रकारे शक्तीपरीक्षण केल्याचे पाहायला मिळाले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरु झालेल्या या मोर्चात शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील,95 गाव प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर, मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादीचे सतीश पाटील, प्रशांत पाटील, काँग्रेसचे आर सी घरत, सुदाम पाटील, शेकाप माजी नगरसेवक रवींद्र भगत, गणेश कडू, शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील, माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांच्या सोबत परिसरातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी बोलताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रशासनाकडून मालमत्ता कर वसुली करता राबवण्यात येत असलेल्या कारभारावर टीका केली.प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या कर वसुलीतून पालिका हद्दीतील नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही काम केले नसल्याचा आरोप केला. कराच्या वसुलीतून केवळ पालिका मुख्यालय, आयुक्त निवास तसेच महापौर निवासचेच काम केले असल्याची टीका केली. मात्र त्याच वेळी मोर्चा दरम्यान आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चे दरम्यान आंदोलकांकडून करण्यात आलेल्या मागण्यावर आयुक्त देशमुख सकारात्मक असल्याची माहिती देत या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे आश्वासन आयुक्त देशमुख यांनी दिल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
आयुक्तांसमवेत चर्चा
मालमत्ता करा संदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चा दरम्यान आंदोलन कर्त्यांच्या नेत्यांनी आयुक्त देशमुख यांची भेट घेत चर्चा केली आहे. या चर्चे दरम्यान मालमत्ता कर वसुली बाबत कोणताही ठोस निर्णय होई पर्यत कर वसुली बद्दल प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये अशी मागणी करण्यात आली आहे
आंदोलकांकडून करण्यात आलेल्या मागण्यांची माहिती मुख्यमंत्री यांना देणार आहे.त्याचप्रमाणे नेत्यांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक लावून या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न निश्चित करणार आहे. – गणेश देशमुख. आयुक्त.
प्रशासनाने आता पर्यत केलेल्या कर वसुलीतून करदात्या नागरिकांकरिता कोणत्याही प्रकारच्या सोईसुविधा निर्माण केलेल्या नाहीत. नागरिकांना भेडसावणारे प्रश्न कायम आहेत. असे असताना करवसुली करता प्रशासन करत असलेल्या सक्तीला आमचा विरोध असून, प्रशासनाने प्रथम योग्य निर्णय घेऊन नागरिकांचे समाधान करावे. आणि मगच कर वसुली करावी अशी आमची आग्रही मागणी आहे. – बाळाराम पाटील. माजी आमदार
मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी
मोर्च्यात सहभागी नागरिकांकडून पालिका प्रसासन आणि तत्कालीन सत्ताधार्यांविरोधात प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत होती. सध्या राज्यात सुरु असलेल्या सत्तकारणात गाजत असेलेली पन्नास खोके एकदम ओक्के ही घोषणा देखील या वेळी आंदोलकांकडून देण्यात येत होती. आंदोलनात सामील झालेले महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष, शिव सेना ( उद्धव ठाकरे ), राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष तसेच कॉग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आप आपल्या पक्षाचे झेंडे, टोप्या तसेच पक्ष चिन्ह असलेले उपरणे परिधान केले होते. या विविध रंगांच्या टोप्या आणि झेंड्यांमुळे मोर्चाचे स्वरूप रंगीबेरंगी झाले होते.