आंबिवली गावामधील घराला भीषण आग

घरातील सर्व साहित्य जळून खाक

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील आंबिवली गावातील एका शेतकऱ्याचे घर आगीत भस्मसात झाले. घराला आग लागले त्यावेळी घरात कोणीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, घराचे मोठया प्रमाणात नुकसान या आगीमध्ये झाले आहे.

कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगांव तर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली गावाचे प्रवेशद्वारावर असलेले जगदीश कराळे यांच्या घराला पहाटे भीषण आग लागली होती. पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास ही आग लागली आणि त्यावेळी जगदीश कराळे यांच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती नव्हते. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, ही आग विझवण्यासाठी आंबिवली गावातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ तत्परता दाखवत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही आग इतकी भयंकर होती की या आगीमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत, तसेच या आगीच्या ज्वालांमध्ये घराचे पत्रे देखील फुटले आहेत. रात्रीच्या वेळी गाव झोपेत असताना लागलेल्या आगीमध्ये जगदीश कराळे यांच्या घराचे खूप मोठे नुकसान झाले आहे. घरात असलेले सर्व फर्निचर, कपडे, धान्य अन्य साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू असे सर्वच साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने घेतलेले रौद्र रूप यामुळे घर क्षणात जळून खाक झाले आहे.

नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मात्र, आगीचे कारण कळू शकले नसले तरी या आगीमध्ये घरातील किंमती साहित्य जळून खाक होत असताना कोणीही व्यक्ती घरात नसल्याने जीवितहानी झाली नाही.

Exit mobile version