मविआने निवडणुका एकत्र लढवाव्यात: पवारांचे सुचक वक्तव्य

। कोल्हापूर । प्रतिनिधी ।
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, अशी इच्छा असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. याबाबत महाविकास आघाडीचा अद्याप निर्णय झालेला नाही. पण एकत्र निवडणूक लढण्यास फार अडचण येणार नसल्याचे पवार म्हणाले. शरद पवार हे कोल्हापूर (घेश्रहर्रिीी) जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहे. रविवारी त्यांनी कोल्हापुरात सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

सत्ता हातात असताना जमिनीवर पाय ठेऊन वागायचे असते. पण अलिकडच्या काळात सत्ता ज्यांच्या हातात त्यांच्याकडून चुकीची भाषा केली जात आहे. हे राजकीय नेत्यांचे खरे काम नाही. – शरद पवार, राष्ट्रवादी अध्यक्ष

कडवा शिवसैनिक ठाकरेंकडे
शिवसेनेत दोन गट पडले ही गोष्ट खरी आहे. पण जो कडवा शिवसैनिक आहे, जो फिल्डवर काम करतो तो कार्यकर्ता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे शरद पवार म्हणाले. याला कोल्हापूर देखील अपवाद नाही. काही आमदार खासदार इकडून तिकडे गेले असतील. पण उद्या येणार्‍या निवडणुकीत जनतेच्या भावना लक्षात येतील असेही शरद पवार म्हणाले.

राज्यपालांवर आम्ही पण सगळे नाखूष
राज्यपाल इथं नाखूष असतील तर आम्ही पण सगळे त्यांच्याबद्दल नाखूष आहोत. पहिले असे राज्यपाल आहेत की सतत त्यांच्यावर टीका होत आहे. जनता त्यांच्यावर टीका करत आहे. महााषट्रात एक चांगली परंपरा आहे. राज्यात अनेक चांगले राज्यपाल आले. जे जे राज्यपाल महाराष्ट्रात आले पक्ष कोणताही असो पण राज्याच्या हिताच्या गोष्टी मांडल्या. सध्याचे राज्यपाल अस आहेत की त्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. सतत लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. ते चुकीची वक्तव्य करत आहेत. त्यामुळं जनतेला त्यांच्याबद्दलची नापसंती द्यावी लागते असे शरद पवार म्हणाले. राज्यपाल हे महत्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण ती सध्याच्या राज्यपालांकडून राखली जात नाही.

राहुल गांधींच्या पदयात्रेचा फायदा होईल
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या संदर्भात सत्ताधारी पक्षाने टीका टिंगलटवाळी केली. भारत जोडो यात्रा ज्यावेळी सुरु झाली त्यावेळी देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली. परंतू राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पक्षापुरती राहिली नाही. सर्वसामान्य लोक, विविध पक्षाचे लोक त्यामध्ये सामील झाल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी देखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचे पवार म्हणाले. राहुल गांधींच्या पदयात्रेचा फायदा होईल असे पवार म्हणाले.

Exit mobile version