शासन, प्रशासनाकडे माथेरानकरांचे साकडे
| माथेरान | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध असताना इथल्या पर्यटनवाढीसाठी प्रयत्न केले जात नाहीत. निवडणूक काळात सर्वच नेत्यांना मतांसाठी माथेरान आठवते, पण निवडणुका पार पडल्यानंतर प्रत्यक्षात कुणीही इथल्या स्थानिकांच्या अडीअडचणी, मूलभूत सुविधांचा अभाव ज्ञात असतानादेखील हेतुपुरस्सर कानाडोळा करत आहेत. ही माथेरानच्या समस्त पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकप्रकारे अवहेलना राजकीय नेते करत असतात. माथेरानच्या पर्यटनक्रांतीसाठी शासन, प्रशासनाचा सकारात्मक दृष्टीकोन आवश्यक आहे, असे माथेरानकरांचे म्हणणे आहे.
माथेरानला उन्हाळ्यात पर्यटकांची गर्दी असतेच, परंतु मागील काही वर्षांपासून वर्षाऋतुमध्येही सुट्ट्यांच्या हंगामात तसेच शनिवार आणि रविवार या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा महापूर ओसंडून वाहताना दिसत आहे. मुख्य म्हणजे हे ठिकाण मुंबईपासून अगदी जवळ असल्याने नव्वद टक्के एकदिवसीय पर्यटकांची रेलचेल सुरूच असते. पावसाळ्यात गर्द झाडीमधून पावसाच्या शीतल धारा अंगावर झेलत प्रवास करण्याची मजा काही औरच असते. दाट धुक्याच्या सानिध्यात निसर्गाशी हितगुज करण्यात आणि इथल्या शांत वातावरणात रमण्यात एक वेगळीच अनुभूती मिळते त्यासाठी वर्षाऋतुमध्ये विशेषतः शनिवार आणि रविवारी पर्यटकांची यात्रा भरलेली दिसते. नेहमी येणाऱ्या पर्यटकांना इथली भौगोलिक परिस्थिती ठाऊक असते.त्याच डोंगर दऱ्या, ओबडधोबड रस्ते, पर्यटकांना सुसज्ज सोयीसुविधा उपलब्ध नाहीत याची पूर्णपणे कल्पना असतानादेखील केवळ हे अगदी जवळचे आणि स्वस्त दरात उपलब्ध होणारे पर्यटनस्थळ असल्यामुळेच इथे पर्यटक येत असतात. त्यांच्यामुळे सर्वाना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात.
आजही इथला सर्वसामान्य माणूस मुलाबाळांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पर्यायी मार्ग असावा असे स्वप्न उराशी बाळगून आहे, परंतु माथेरानविषयी आस्था असणारा सक्षम राजकीय नेता जोपर्यंत लाभत नाही तोवर इथे कोणत्याही प्रकारची सुविधा आणि स्थानिकांच्या समस्या मार्गी लागणार नाहीत, हे त्रिवार सत्य नाकारता येत नसल्याचे ज्येष्ठ मंडळी बोलत आहेत.