। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील वाढती वाहतूक कोंडी, अवैध वाहनतळामुळे होणारे अपघात रोखण्याबाबत चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी (दि.25) जेएनपीटी कामगार वसाहतीमधील सभागृहात सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.
यासंदर्भात उरण सामाजिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने जेएनपीटी, सिडको व प्रशासन यांची संयुक्त समिती नेमण्याची सूचना केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार संघटनेच्यावतीने आयुक्तांना पत्र देण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील व सचिव संतोष पवार यांनी दिली.