आदिवासी बांधवांची पाण्यासाठी वणवण
खड्ड्यातील पाण्यावर भागवावी लागतेय तहान
नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या मेंगाळवाडीत पावसाळ्यातही पाण्याची समस्या गंभीर आहे. डोंगरातून फुटणार्या पाझर यांचे पाणी खड्डा खोदून साठवून ते पाणी आदिवासी बांधव आपली तहान भागवण्यासाठी वापरत आहेत.
तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मेंगाळवाडीत पावसाळ्यातदेखील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे. साधारण 35 घरांची वस्ती असलेल्या मेंगाळवाडीत 125 लोक राहतात. आदिवासी वाडीसाठी दोन विहिरी आहेत. मात्र, वाडीपासून पाण्याच्या विहिरींचे अंतर खूप आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पावसाळ्यात पाण्यासाठी गावाजवळील डोंगराच्या कपारीत खड्डा म्हणजे डवरे खोदून त्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते.
आदिवासी वाड्या-वस्त्यांवर निवडणुकीच्या काळात अनेक पुढारी आश्वासने देऊन मते मिळवतात आणि नंतर पाच वर्षे गायब होतात. मात्र, वाडीचा विकास होणार या आशेने असणार्या आदिवासींच्या पदरी मात्र निराशाच पडत आहे. मात्र, शासनाचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांच्या आश्वासनांची पोतली कधी उघडलीच जात नाही आणि आदिवासी वाडी-वस्तीवर विकासाचा जन्म होत नाही, अशी स्थिती वर्षानुवर्षे सुरु आहे.
पाण्याचा प्रश्न निकाली निघावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याकरिता जल जीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.
मंगल ऐनकर, सरपंच, खांडस
गेली अनेक वर्षे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मेंगाळवाडी येथील नागरिक खड्ड्यातील दूषित पाणी पिताहेत. शासनाच्या पेण आदिवासी प्रकल्प यांच्याकडे आलेला निधी जातो तरी कुठे? याचा शोध जागरूक ग्रामस्थांनी घ्यायला हवा.
कृष्णा शिंगोळे, कार्यकर्ते
पाणी योजना राबवण्याची क्षमता असताना देखील वाड्यांमध्ये पाणी योजना येत नाही. यासाठी गेली अनेक वर्षे आमचे आदिवासी बांधव शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत. पण, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
जैतु पारधी, आदिवासी कार्यकर्ते