भारत उपांत्य फेरीत जाणार नाही
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषकासाठी अवघ्या एका महिन्याचा कालावधी उरला आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. भारतासह अनेक देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटच्या विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी दिग्गजांनी भविष्यवाणी करत आपला अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे. अशातच इंग्लंडच्या संघाचा माजी खेळाडू मायकेल वॉनने भविष्यवाणी करताना विश्वचषकातील चार सेमी फायनलिस्ट जाहीर केले आहेत.
2022 च्या टी-20 विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. मायकेल वॉनने विश्वचषकाबद्दल भाष्य करताना मोठी भविष्यवाणी केली. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, यंदाच्या टी-20 विश्वचषकात माझ्या म्हणण्यानुसार, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे चार संघ उपांत्य फेरी गाठतील. एकूणच वॉनने भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत जाणार नसल्याचे म्हटले.
भारतीय संघ रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. राखीव खेळाडू- शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद.
विश्वचषकासाठी चार गट अ- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका ब- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान क- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी ड- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ.