महावितरणचा महाभोंगळ कारभार
नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील कोळीवाडा आणि उरण नाका परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणने वेळीच आपला कारभार सुधारला नाही, तर नागरिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
पनवेलमधील उरण नाका आणि कोळीवाड्यातील विजेची परिस्थिती सध्या ग्रामीण भागाला लाजवेल अशी आहे. येथील वीजपुरवठा दिवस, रात्री कधीही अचानकपणे खंडित होतो. लोक कामावरून दमून भागून घरी आल्यावर झोपायला गेल्यावर नेमकी लाईट जाते. रात्री-अपरात्री लाईट जात असल्याने झोपेचे तीनतेरा होतात. हल्ली कोरोना आणि अन्य साथरोगांचा प्रादुर्भाव असल्याने अनेक घरांमध्ये रुग्ण आहेत. त्यांना सर्वाधिक त्रास होतो. याशिवाय वृद्ध, लहान मुलेही विजेविना अस्वस्थ होऊन जातात.
ऑक्टोबर हीटचा त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे. रात्रीच्या तापमानातही कमालीची वाढ झालेली आहे. अशा वेळी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. महावितरणने वरवरची मलमपट्टी न करता यावर ठोस व कायमस्वरूपी मार्ग काढावा; अन्यथा मोर्चा काढून जाब विचारला जाईल, असा इशारा उरण नाका आणि कोळीवाड्यातील नागरिकांनी महावितरणला दिला आहे.
नागरिक साशंक
रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्यावर हाकेच्या अंतरावर असलेल्या महावितरण कार्यालयाच्या संपर्क क्रमांकावर फोन केला असता, समोरून प्रतिसाद देण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. थेट कार्यालयात जाऊन चौकशी करण्यास गेल्यावर बहुतांश वेळी तिथे कुणीही अधिकारी अथवा कर्मचारी उपलब्ध नसतात. तेथील लाईट्स मात्र सुरू असतात. त्यामुळे ही मंडळी आतमध्ये झोपा काढत तर नाही ना, अशी नागरिकांमध्ये शंका आहे.