आ.जयंत पाटील यांचा सूचक इशारा
माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचे काम येणार्या काळात शेकाप करणार असल्याचे सूचक वक्तव्य आम.जयंत पाटील यांनी राजिवली,ता.माणगाव येथे केले.
राजिवली गावातील रस्त्याच्या कामाचा उदघाटन ,सोमजाई मंदिराचा कलशारोहण व उदघाटन समारंभ,शाळा व अंगणवाडीचा उदघाटन आ.जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन करताना खा.सुनील तटकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
यावेळी माजी आमदार पंडित पाटील,शेकापचे ज्येष्ठ नेते नानासाहेब सावंत, अस्लम राऊत, राजिपचे माजी सभापती अॅड,राजीव साबळे, शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे, राजिप सदस्या स्वाती नवगणे,माजी समाजकल्याण सभापती अशोक गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय पंदेरे,मधुकर अर्बन,भागोजीबुवा डवले,बळीराम खडतर,सुभाष अर्बन,संदीप अर्बन आदींसह राजीवली ग्रामस्थ,महिला मंडळ व शेकाप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजीव साबळे बरोबर बोलतात मी ज्यांंना मदत करतो ते उलटे फिरतात.आम्ही राजकारण करीत असताना आपली सामाजिक बांधिलकी सोडली नाही.गरीब,शेतकरी,कष्टकरी जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव कार्यरत राहिलो.दिलेला शब्द आम्ही पाळतो.
आ.जयंत पाटील
माजी आ.अशोक साबळे यांच्या कार्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. 1971 साली काँगेस पक्षात प्रवेश केला.त्यांनी समाजासाठी मोठे योगदान दिले.शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव असे काम करून ते शैक्षणिक संकुल पुढे अँड.राजीव साबळे यांनी वाढविले. आज जिल्ह्यात वाईट पद्धतीने राजकारण सुरू आहे.आपल्यात पैसे आणण्याची हिंमत नाही पण ज्यांनी विकास कामांसाठी पैसे आणले ते मीच आणले आहे. असे काहीजण सांगत आहेत. सभागृहात आपण प्रभावीपणे अभ्यासपूर्वक असे काम केले तर विकासाचे प्रश्न मार्गी लागत असतात. चांदोरे ग्रामपंचायतीला आपण 1 कोटी 20 लाख रुपयांचा विकासनिधी दिला आहे.आपल्याला टक्का, टक्केवारी व ठेकदारी हे काही माहीत नाही. जनतेची कामे झाली पाहिजेत या भावनेतून आम्ही समाजात काम करतो.असे ते म्हणाले. बॅ.अंतुले यांनी कोकणात चांगले काम केले पण त्यांची एकच चूक झाली,त्यांनी ज्यांना मोठे केले त्यांनीच त्यांना संपवले.शेकाप कधीच मागून खंजीर खुपसत नाही तर समोरून खुपसतो.एखाद्याला मदत करायची तर करायची अन्यथा लढायचे तर समोरासमोर लढायचे ही भूमिका शेकापची राहिली आहे,असे त्यांनी निक्षून सांगितले.
20 हजार बचत गट
शेकापने जिल्ह्यात 20 हजार महिला बचत गट तयार केले आहेत.या बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी पापड,लोणचे असे पदार्थ तयार करून त्याची विक्री करावी.व्यक्तीगत विकास साधला तरच तुमचा आर्थिक विकास होईल असेही ते म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करताना अँड.राजीव साबळे यांनी शेकपाच्या कामाचा नारळ राष्ट्रवादी फोडते नक्की काय चाललंय तेच समजत नसल्याचे सांगितले. प्रास्ताविकात शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल करीत राजीवली गावातील विहिरीचे, रस्त्याचे काम शेकापने केले असल्याचे सांगत या गावातील विकासाची कामे फक्त नी फक्त शेकापने केल्याचे सांगून शेकापची नाळ विकास कामांशी जुळलेली आहे.आम्ही मतांसाठी राजकारण कधी केले नाही असेही ते म्हणाले.या कार्यक्रमात राजीवली गावचे सुपुत्र रायगड भूषण पुरस्काराचे मानकरी ठरलेले मधुकर अर्बन यांचा आमदार जयंतभाई पाटील यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.