माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील यांचा आरोप
| नेरळ | प्रतिनिधी |
लोकसभा निवडणुकीच्या निकालात मी हरलो तर, मी देशाचा अवतार आहे असे भासविण्यासाठी नरेंद्र मोदी ध्यानधारणा करायला बसले आहेत. मात्र, त्यांची ध्यान धारणा ही खोटी असून, तुमचे आमचे लक्ष विचलित करण्यासाठी मीडियाला समोर ठेवून ध्यान धारणा सुरू आहे, असा आरोप माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील यांनी कर्जत येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केला.
माजी न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील यांनी यावेळी बोलताना देशात दहा वर्षे मनुस्मृतीप्रमाणे कामकाज सुरू आहे. संविधान नावापुरते राहिले असून, संसद चालत नाही. आपल्या हातात इडी, सीबीआय या सर्व यंत्रणा हातात ठेवून देश चालवत आहे याला काय म्हणावे, असा प्रश्न विजय कोळसे पाटील यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशात कोणी नाही असे भासवून दररोज खोटे बोलायचे आणि आपल्याशिवाय देशात काही नाही हे भासाविण्यासाठी हे तपश्चर्या करीत आहेत. आम्हीदेखील तपश्चर्या केली असून, 49 कॅमेरे लावून तपश्चर्या करायची असते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. देशातील जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ही ध्यान धारणा सुरू असून, देश हुकुमशाहीकडे चालला आहे, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
75 वर्षीय अॅड तुकाराम ढोले हे ट्रक चालक ते वकील आणि एसटी चालकपासून वाहक आणि पुढे दहावीचे शिक्षण पूर्ण करून बीए ही पदवी घेतली आणि वकिलीचा शिक्षणदेखील पूर्ण केले. त्यांनी ठरवा काय करायचे- मनुस्मृती की संविधान हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन शेतकरी नेते राजाराम पाटील, इतिहास संशोधक वसंत कोळंबे, अॅड. दीपक गायकवाड, अॅड. गोपाळ शेळके, सुरेश सोनावणे, जनार्दन खंडागळे आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला बबन गायकवाड, अॅड. कैलास मोरे, वेच्या गावित, रमेश खैरे, बागडे गुरुजी, यशवंत फाले, कुणाल ढोले आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सुरुवातीला धार्मिक विधी मनोहर ढोले यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन सुधाकर ढोले, सिद्धांत ढोले, अजय खंडागळे, नीलम ढोले, डॉ पूनम ढोले, प्रशांत साळुंखे, विजय कोंडिलकर यांनी केले.







