उरण-भाऊचा धक्का लाँचसेवा होणार सुरळीत
। उरण । वार्ताहर ।
गाळामुळे सातत्याने विस्कळीत होत असलेली उरण भाऊचा धक्का प्रवासी लाँचसेवा सुरळीत करण्यासाठी अखेर मोरा बंदरातील साचलेला गाळ 1 मे पासून काढण्याला सुरुवात झाली आहे. मे महिन्यात ते पूर्ण होणार आहे. कोट्यवधी रुपये खर्चून सुरू केलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे आता ओहोटीमुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक लागणार नसल्याने दररोज प्रवास करणार्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मोरा बंदरातील साचलेल्या गाळामुळे आणि इतर समस्यांमुळे उरण-भाऊचा धक्का ही अत्यंत त्रासदायक ठरू लागली आहे. त्यामुळे या मार्गावरून लाखोंच्या संख्येने प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या आता काही हजारांवर आली आहे.उरण ते मुंबई लाँचमार्गे प्रवास करीत असताना 80 रुपये मोजावे लागत असून रस्त्याच्या प्रवासापेक्षा निम्म्या वेळेत मुंबईत पोहोचता येते. मात्र, या मार्गाने प्रवास करीत असताना येथील प्रवाशांना अनेक असुविधाना सामोरे जावे लागत आहे. जेट्टीवरच करण्यात येणार्या दुचाकीच्या पार्किंगमुळे प्रवाशाना कसरत करावी लागते. मोरा बंदर गाळमुक्त होणार असल्याने सुमारे तीन लाख प्रवाशांना दिलासा मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया मुंबई जलवाहतूक संस्थेच्या पदाधिकार्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
गाळ काढण्याच्या कामामुळे प्रवाशांना सतावणारी गाळाची समस्या दूर होणार असून,जेट्टीच्या दुरुस्तीचा प्रस्तावही पाठविला आहे. – प्रभाकर पवार, मोरा बंदर निरीक्षक