तटकरेंच्या ‘पॉवर’ची चर्चा रंगली; पत्नीचा पराभव ठरला सेटबॅक
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागांसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करताच कोकणात राजकीय भूकंपाचे धक्के बसले आहेत. चर्चेत असलेले खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव यादीतून गायब झाल्याने खारेपाटातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह एका क्षणात मावळला. परिणामी, “कमळ कोमजले” अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटताना दिसत आहे.
कोकणातून राज्यसभेत प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झालेल्या धैर्यशील पाटलांचे नाव वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या निर्णयामागे स्थानिक समीकरणे विशेषतः तटकरे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीतील कमबॅक आणि धैर्यशील पाटील यांच्या पत्नीचा पराभव कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय गल्लीबोळात रंगली आहे.
16 मार्चला होणाऱ्या निवडणुकीपूर्वीच राजकीय डावपेचांना वेग आला आहे. मातब्बर नेत्यांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग केल्याची चर्चा होती; मात्र अंतिम यादीने सर्वच समीकरणे धुळीस मिळवली. खारेपाटातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा असून, दोन वर्षांचीच खासदारकी ठरली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्थानिक पातळीवर नेतृत्वाला बळ देण्याऐवजी बाहेरच्या चेहऱ्यांना प्राधान्य दिल्याची भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे कोकणातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तटकरेंच्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यातील निवडणुकांवरही परिणाम होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून, खारेपाटातील कमळ पुन्हा उमलणार की कोमेजलेल्या अवस्थेतच राहणार, याची उत्सुकता वाढली आहे.
महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी होणाऱ्या सात जागांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. तावडे, आठवलेंसह चौघांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, भाजपच्या धक्कातंत्राची मोठी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागांसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करत धक्कातंत्राचा वापर केला. कोकणातील चर्चेत असलेले खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव यादीतून वगळण्यात आल्याने खारेपाटातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असल्याचे चित्र दिसून आले.
महाराष्ट्रातील सात जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने (दि.4) आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने अनुभवी दोन, तर दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली. राज्यसभेतून राज्यातील सात दिग्गज नेते निवृत्त होत असून, त्यांच्या जागांवर पुन्हा 16 मार्चला निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणीला वेग आला असून, महायुतीच्या वाट्याला चार जागा आल्या, तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक. या एका जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित झाले असून, महायुतीतील जागा वाटपातून भाजपला चार आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा आली आहे.
शरद पवारांना राज्यसभेची उमदेवारी
मुंबई : महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबद्दलची घोषणा काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे आभार मानले. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. शरद पवार रिंगणात उतरल्यानं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत खासदार सुप्रिया सुळेंनी शरद पवारांच्या नावाची घोषणा केली. शरद पवारांच्या संसदीय कारकीर्दीला 59 वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत ते विधानसभा, लोकसभा, राज्यसभेवर अनेकदा निवडून गेले आहेत. विशेष म्हणजे या कालावधीत ते एकही निवडणूक हरलेले नाहीत. ते दोनदा राज्यसभेवर गेले आहेत. दोन्ही वेळा त्यांची निवड बिनविरोध झालेली आहे. त्यामुळे यंदाही पवार हाच ट्रॅक रेकॉर्ड कायम राखणार का, याची उत्सुकता आहे.
