कोळसाटंचाईने महावितरण संकटात

भारनियमन टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु
वीजनिर्मिती केंद्रांतील
13 संच बंद
मुंबई | प्रतिनिधी |
कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणार्‍या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील 13 संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल 3330 मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे.
महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी 210 मेगावॅटचे तसेच पारस- 250 मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील 500 मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच पोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) 640 मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) 810 मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणार्‍या विजेमध्ये घट होत आहे.


खुल्या बाजारातून वीज खरेदी
खुल्या बाजारातून 700 मेगावॅट विजेची खरेदी 13 रुपये 60 पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर सकाळी रियल टाईम व्यवहारातून 900 मेगावॅट विजेची 6 रुपये 23 पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे. रविवारी सकाळी 11.30 वाजता राज्यात 18,200 मेगावॅट तर महावितरणच्या कार्यक्षेत्रात 15 हजार 800 मेगावॅट विजेची मागणी होती कृषिवाहिन्यांवर दररोज 8 तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे.

महावितरणचे आवाहन
कोळसा टंचाईमुळे विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता अधिक असल्याने मागणी व पुरवठा यात समतोल ठेवण्यासाठी वीजग्राहकांनी सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेदरम्यान विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. विजेची सर्वाधिक मागणी असणार्‍या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तूट कमी होईल व भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.

Exit mobile version