। अलिबाग । प्रतिनिधी ।
वीटा तयार होऊन भाजणीच्या मार्गावर असताना, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडल्याने सार्या व्यवसायाचा चिखलच झाला आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने सुरुवात केली. रात्रीच्यावेळी पडत असलेल्याया अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील विटांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यवसायिकांकडून सांगण्यात आले आहे. वीटभट्टी व्यवसायिकांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
भात कापणीची कामे संपल्यावर नोव्हेंबर महिन्यांपासून या व्यवसायाला सुरुवात होते. शेतांमध्ये अथवा मोकळ्या जागेमध्ये वीट तयार करण्याचा कारखाना तयार केला जातो. या व्यवसायामध्ये आदिवासी वाड्यांमधील कामगारांची संख्या अधिक आहे. अलिबागसह रोहा, कर्जत, मुरुड, कर्जत, पनवेल या तालुक्यात हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे . जिल्ह्यात दोन हजारापेक्षा अधिक वीटव्यवसायिक असून या व्यवसायातून एक लाखापेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार मिळत आहे. या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.
वेगवेगळे बंगले, इमारती उभारणीसाठी विटांची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शेतकरी विटांची पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 6 मार्च रोजी होळीच्या दिवशी अचानक अवकाळी पाऊस पडला. या पावसाने वीट व्यवसायिकांची धावाधाव सुरु झाली. तयार केलेल्या विटा, भाजणीसाठी रचून ठेवलेल्या विटा तसेच वीट तयार करण्यासाठी लागणारे तुस, वीट भाजणीसाठी लागणारी लाकूड भिजल्याने व्यवसायिकांना मोठा फटका बसला, त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचे संकट पुन्हा समोर आले आहे. या संकटापासून विटांचा बचाव करण्यासाठी व्यवसायिकांनी प्लास्टीक कापडचा अधार घेतला आहे. अवकाळी पाऊस कधीही पडत असल्याने 24 तास विटांवर प्लास्टीक कापड ठेवण्याची वेळ आली आहे. पाऊस पडत असल्याने वीटभाजणीला देखील विलंब होत आहे. त्यामुळे ग्राहकांपर्यंत मुदतीत विटांचा पुरवठा करताना व्यवसायिकांना अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे.
शासनाला महसूल मिळवून देण्यामध्ये वीट व्यवसायिकांचा महत्वाचा सहभाग असताना त्यांना भरपाई का दिली जात नाही, अशी खंत विट व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.
पावसाची पूर्व सुचना देण्यास प्रशासन उदासीन
विट व्यवसायिकांना पुर्वी पाऊस पडणार असल्याची सुचना यापुर्वी गाव पातळीवर तलाठी, सर्कल देत होते. परंतू गेल्या काही वर्षापासून कोणत्याही प्रकारची सुचना दिली जात नाही. त्यामुळे विट व्यवसायिक या संकटापासून अनभिज्ञ असतात. पावसाची पुर्व सुचना देण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याने विट व्यवसायिक मोठ्या आर्थिक संकटात सापडला असल्याचा आरोप वीटव्यवसायिकांनी केला आहे.
अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे तयार केलेल्या विटा लवकर भिजत नाही. अनेकजण हा व्यवसायक कर्ज काढून करतात. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची सरकारने दखल घेऊन वीट व्यवसायिकांना बळ द्यावे अशी मागणी होत आहे.
वीट व्यवसायिक – नाव न सांगण्याच्या अटीवरून