| रसायनी | प्रतिनिधी |
देवनार येथील कचराभूमीवर गेल्या 14 वर्षापासून ठाण मांडून असणारा मुंबईतील वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प अखेर रायगड जिल्ह्यातील पातळगंगा अैाद्योगिक पट्टयात हलविण्याचा महत्वपुर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी आवश्यक असलेला 18 हजार 600 चौरस मीटरचा विस्तीर्ण असा भूखंड संबंधित कंपनीस वितरीत करण्याचा निर्णय महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. शासनाने देवनारच्या प्रकल्प पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमध्ये आणण्याचा निर्णय घेतला असलातरी रसायनी परिसरातील ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. ग्रामसभांमध्ये प्रकल्प नको असा ठराव एकमुखाने घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
देवनार येथील वैद्यकीय कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प आल्याने पाताळगंगा एमआयडीसी हद्दीतील गावांचे गावपण नाहीसे होणार आहे. जी पाताळगंगा परिसरातील खेडोपाड्यात शुध्द हवा ती प्रदूषित होणार आहे. ग्रामस्थांना मोकळा श्वास घेणे कठीण होवून बसणार आहे. त्यामुळे सदर प्रकल्प येणार असल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आतापासूनच विरोध करण्यास सुरूवात केली आहे. काही होवू दे , आम्ही हा प्रकल्प येवू देणार नाही अशी ठोस भूमिका पाताळगंगा परिसरातील विविध गावातील ग्रामस्थांनी घेतली आहे. सदर प्रकल्पाबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची जनसुनावणी घेण्यात आलेली नाही. जनसुनावणी घेतल्याशिवाय या प्रकल्पाला मान्यता मिळणार नाही. त्यामुळे पाताळगंगा परिसरातील नागरिक जनसुनावणीची वाट पाहत आहेत.
दरम्यान या वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरिता नव्या जागेचा शोध मुंबई महापालिका तसेच राज्य सरकारने सुरु केला होता. अखेर रायगड जिल्ह्यात पाताळगंगा एमआयडीसी पट्टयात ही जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेतील सुत्रांनी दिली. महाराष्ट्र अैाद्योगिक विकास महामंडळाने संबंधित कंपनीला या प्रकल्पासाठी 18 हजार चौरस मीटरचा विस्तीर्ण भूखंड पातळगंगा एमआयडीसी भागातील बोरीवली विभागात वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावास नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती एमआयडीसीतील सुत्रांनी दिली.
मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेला गोवंडी परिसरातील रहिवाशांना नकोसा झालेला जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प इतरत्र हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा एमआयडीसीत उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प रसायनीत आणू नये, अशी मागणी स्थानिक रहिवासी अंकुश ठाकूर यांनी केली आहे. त्यांनी खालापूर तहसीलदार व एमआयडीसीला यासंदर्भात पत्र लिहिले आहे.