किरकोळ वादातून एकाची हत्या

पनवेल | वार्ताहर |
किरकोळ वादासह दागिन्यांच्या हव्यासापोटी एका इसमाची हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील ओवळे गावाच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील बेलवली गावात राहणारे बाळाराम पाटील (60) यांची हत्या ओवळे गावातील एका घरात करण्यात आली होती. प्रथम गळा दाबून नंतर तोंडात तिखट चटणी टाकून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे हातपाय खुर्चीला बांधून त्यांना घरात कोंडून ठेवून त्यांच्या अंगावरील 20 तोळे सोने जबरीने चोरून एक महिला व एक पुरुष तेथून पसार झाले असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सपो आयुक्त सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि गुन्हे संजय जोशी, पो.उप.नि. सुनील तारमाळे, मनोज महाडिक व त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे एक पथक बुलढाणा येथे रवाना झाले. या गुन्ह्यातील आरोपी मंगेश खेत्री याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याकडून जबरी चोरीचे 17 तोळे सोने हस्तगत केले. तर, या गुन्ह्यातील दुसरी आरोपी नंदा ठाकूर हिला कामोठे मॅकडोनाल्डसमोर ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात केला आहे.

Exit mobile version