उदय सामंत यांचे गौरवोद्गार
चिपळूण | प्रतिनिधी |
नाम फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद असून, त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. जे काम शासनाने करणे आवश्यक आहे, ते काम नाम फाऊंडेशन करत आहे. येत्या दीड महिन्याच्या आत नामचे गाळ काढण्याचे काम संपले तरी उर्वरित काळात पुढील काम फाऊंडेशन करणार आहे. नाम फाऊंडेशन ही महाराष्ट्रासाठी भूषणावह संस्था असल्याचे गौरवोद्गार उदय सामंत यांनी यावेळी काढले.
चिपळूण बचाव समितीने केलेल्या आंदोलनाला चांगले यश आले असून, गाळ काढण्यासाठी लागणार्या फक्त इंधनासाठी साडे नऊ कोटी दिलेले आहेत. 30 तारखेपर्यंत दोन शीपमध्ये काम केले जाणार असून, त्यासाठी अजून दोन मशीन मागविल्याचे नामदार उदय सामंत यांची रविवारी चिपळूण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, प्रांताधिकारी प्रवीण पवार आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रात एकाच ठिकाणी गाळ काढण्यासाठी एवढया मोठ्या स्वरूपात यंत्रणा पहिल्यांदाच उभी राहिली आहे.गाळ काढण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्यासाठी आपण सूचना केल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीवरचा जुना पूल ताबडतोब काढून टाकावा, ज्यामुळे पाण्याचा लोंढा अडला जाणार नाही ही गोष्ट मंत्रीमहोदयांनी स्वतः मान्य करून ही कार्यवाही पावसाळ्यापूर्वी त्वरित होईल असे वचन यावेळी दिले आहे. तसेच लाल रेषा व निळ्या रेषा संदर्भात नगरपालिकेने लोकांच्या माहितीसाठी शासनाचा निर्णय मोठ्या बोर्डवर लावावा, असे मुख्याधिकारी यांना सूचित केले आहे. तसेच म्हाडाची 4 एकर जागा आहे त्याठिकाणी, राष्ट्रीय महामार्ग कामाच्या ठिकाणी, काही खाजगी संस्थांना व शाळांना जीआर ची वाट न पाहता,डीपी रोडच्या ठिकाणी हा गाळ टाकण्याची कोणत्याही अद्यादेशची वाट न स्थानिक पातळीवर परवानगी द्यावी असे प्रांताधिकारी यांना सूचित केले. वाशिष्ठीचे पात्र अधिक खोल करण्यापेक्षा बहादूशेख पुलाखालील बेट दोन्ही बाजुंनी कट करावे जेणेकरून नदीपात्र अधिक रुंद होईल अशा स्वरूपाची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.तसेच चिपळूणवासियांच्या श्रद्धेचा विषय असणार्या करंजेश्वरी देवस्थानच्या मापातील जागा सध्या तशीच ठेवावी कारण त्याठिकाणी लोकांच्या भावना जडलेल्या आहेत, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.