जिल्ह्यात 13 ऑगस्टला राष्ट्रीय लोकअदालत

। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल अ. शिंदे यांनी कळविले आहे.

न्यायालयात प्रलंबित असलेली भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे 138 एन.आय अ‍ॅक्ट खालील प्रकरणे, दिवाणी अपिले, तडजोडपात्र पालिका व ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीजवितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने निकाली केल्यास लोकांचा पैसा आणि वेळ यांचा अपव्यय होत नाही, पक्षकारांना तात्काळ न्याय मिळतो. न्यायालयात भरलेले कोर्ट शुल्क परत मिळते. त्यामुळे दि.13 ऑगस्ट रोजी होणार्‍या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष एस.एस. सावंत यांनी केले आहे.

Exit mobile version