बँका, वाहतूक आणि सरकारी कामकाजावर परिणामाची शक्यता
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नवीन कामगार संहितांपासून खासगीकरण, वेतन व सामाजिक सुरक्षेच्या मुद्द्यांपर्यंत विविध मागण्यांसाठी केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी उद्या गुरुवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या बंदमुळे अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालये, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवर अंशतः परिणाम होण्याची शक्यता असून, स्थानिक परिस्थितीनुसार काही ठिकाणी शाळामहाविद्यालयांच्या कामकाजातही अडथळे येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली 10 प्रमुख ट्रेड युनियन तसेच शेतकरी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. नव्या चार कामगार संहितांचा निषेध, खासगीकरणाला विरोध, किमान वेतन व सामाजिक सुरक्षेचे प्रश्न, मनरेगा मजबूत करण्याची मागणी आणि काही प्रस्तावित विधेयकांना विरोध या प्रमुख मुद्द्यांवर हा संप पुकारण्यात आला आहे. संघटनांच्या मते, नव्या कामगार कायद्यांमुळे कामगारांचे हक्क कमी होत असून नोकरीची सुरक्षितता धोक्यात येते.
काय बंद राहू शकते?
देशभर शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा अधिकृत आदेश नसला, तरी काही राज्यांत वाहतूक विस्कळीत झाल्यास किंवा स्थानिक संघटनांनी पाठिंबा दिल्यास शैक्षणिक संस्था बंद राहू शकतात. विशेषतः केरळ, कर्नाटक आणि ओडिशा येथे परिणाम जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालक व विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थांच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बँकिंग सेवांवर परिणाम
सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी संघटनांनी संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बँक शाखांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. मात्र, बँका किंवा रिझर्व्ह बँकेकडून अधिकृत सुट्टी जाहीर केलेली नाही. शाखा उघड्या राहण्याची शक्यता असली तरी व्यवहारांमध्ये विलंब होऊ शकतो. ऑनलाइन बँकिंग, एटीएम सेवा सुरू राहतील, परंतु चेक क्लिअरन्स व इतर सेवांमध्ये अडथळे येऊ शकतात.
सरकारी कार्यालये आणि बाजारपेठा
काही भागांत निदर्शने, रस्ते अडथळे किंवा ‘चक्का जाम’मुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारपेठा, दुकाने आणि सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी राहू शकते. परिस्थितीनुसार काही कार्यालये अंशतः बंद राहू शकतात.
आपत्कालीन सेवा सुरूच
रुग्णालये, रुग्णवाहिका, विमानतळे आणि अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे सांगण्यात आले आहे. मात्र, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रवाशांनी लवकर निघण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एकूणच, ‘भारत बंद’चा परिणाम स्थानिक परिस्थिती आणि संघटनांच्या सहभागावर अवलंबून राहणार असून, नागरिकांनी अधिकृत सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




