पनवेलमध्ये रेती माफियांचा धुडगूस;महसूलची यंत्रणा अपुरी

सक्शन पंपाच्या वापरामुळे कांदळवनांना धोका
। पनवेल । दीपक घरत ।
पनवेल तालुक्यात सक्शन पंपाद्वारे अवैधरित्या करण्यात येत असलेल्या रेती उपशामुळे खाडी पात्रात असलेली नैसर्गिक बेटे उध्वस्त होत आहे. परिणामी, कांदळवनांना देखील धोका पोहचत असल्याचे चित्र उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रावरून स्पष्ट होत आहे. सध्या परिसरात रेती माफियांनी धुडगूस घातला असून महसूल विभागाकडे अपुरी यंत्रणा असल्यामुळे रेती माफियांना अभय मिळत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा तक्रारी करुनही कारवाई होत नसल्यामुळे यंत्रणेचा अभाव आहे कि, अधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासत आहेत, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
सक्शन पंपाच्या वापरामुळे खाडी पात्रातील जैवविविधतेची हानी होत आहे. जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी सर्वच सरकारी यंत्रणानी एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत निसर्गप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पनवेल परिसराला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनार्‍यामुळे पूर्वी मोठ्या प्रमाणात मासेमारी व्यवसाय करण्यात येत होता. मात्र जलप्रदूषणामुळे हा व्यवसाय जवळपास संपुष्टात आला आहे. सरकारने रेती उपशावर घातलेल्या बंदीमुळे स्थानिकांकडून पारंपारिक पद्धतीने करण्यात येणारा रेती व्यवसाय देखील ठप्प झाला आहे. परिणामी, सक्शन पंपाद्वारे अवैध्यरित्या रेती उपसा करणार्‍यांचे फावले असून, खाडी पात्रात असलेल्या नैसर्गिक बेटांच्या आडून मोठ्या प्रमाणात रेती उपसा केला जात आहे.

सक्शन पंपाचा वापर करून बेटा भोवती असणारे खडक फोडले जात असल्याने नैसर्गिक बेटे नष्ट होत असून, बेटांवरील कांदळवनांना देखील धोका पोहचत आहे. कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी नेमण्यात आलेले कांदळवन कक्ष, तहसील विभाग, पोलीस आणि निसर्गाची हानी रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या सामाजिक संस्थानी एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत निसर्ग मित्र संस्थेचे निलेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रातून रेती माफिया कशा प्रकारे नैसर्गिक बेटांना हानी पोहचवत आहेत, हे पाहायला मिळते. संकेतस्थळावर सहजपणे उपलब्ध असणार्‍या छायाचित्रातून ही माहिती उपलब्ध होत असून सुद्धा सुरु असलेले हे प्रकार रोखण्यात शासकीय यंत्रणा अपयशी ठरत असल्याने शासकीय यंत्रणाच्या या कारभाराविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे.

तहसील विभाग कमकुवत
रेतीमाफियावर कारवाई करण्याची जवाबदारी असलेल्या तहसील विभागाकडे कारवाईसाठी अपुर्‍या सुविधा आहेत. एखाद्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी जायचे असल्यास तहसील विभागाच्या अधिकार्‍यांनकडे स्वतःची बोट तसेच आपत्कालीन स्थितीत लागणारे लाईफ जॅकेट उपलब्ध नाही. त्यामुळे अधिकार्‍यांना कायम खासगी बोट चालकांची मदत घ्यावी लागते. तसेच कारवाई करायला जाणार्‍या अधिकार्‍यांवर अनेकदा रेती माफिया हल्ले करत असल्याच्या घटना घडत असताना देखील अधिकार्‍यांना संरक्षण देण्यास स्थानिक पोलीस प्रशासन देखील टाळाटाळ करत असल्याची खंत तहसील विभागाच्या एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

मानवी वस्तींना धोका पोहचण्याची शक्यता
खाडी पात्रात असणारी नैसर्गिक बेट नष्ट झाल्यास भरतीच्या वेळी प्रवाही पुराचा वेग तीव्र होऊन, मानवी वस्तीत पाण्याचा शिरकाव होण्याची शक्यता जास्त आहे. प्रवाहाला नैसर्गिक अडथळे ठरत असलेली बेट काढल्याने खाडी पात्रातील भरतीचे पाणी वाहत राहील व परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल. यामुळे सरासरी समुद्र सपाटीपासून खाली असलेल्या कळंबोलीसारख्या वसाहतीत भरतीचे जास्त पाणी शिरायला वाव मिळून वसाहतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version