। उरण । वार्ताहर ।
लोकनेते माजी खासदार दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वात देशात गाजलेल्या 1984 च्या उरण शेतकरी आंदोलनात आपल्या जमिनींच्या हक्कांसाठी पाच शेतकर्यांनी हौतात्म्य पत्करले. त्यातील तीन शेतकर्यांनी नवघर येथील रेल्वे फाटक असलेल्या नवघर फाटयावर आपले बलिदान दिल्याने हे फाटक ऐतिहासिक ठरले आहे. मात्र उरण ते बेलापूर दरम्यान सुरू होत असलेल्या प्रवासी रेल्वे मार्गासाठी हे फाटक वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे.
उरणमधील शेतकर्यांनी नवी मुंबईच्या उभारणीसाठी शासनाकडून जमिनी संपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याने 16 जानेवारी 1984 ला जासई येथे विरोध करणार्या शेतकर्यांना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन शेतकर्यांचा बळी घेतल्याने शेतकर्यांना हौतात्म्य पत्करावे लागले. दुसर्याच दिवशी शेतकरी नवघर फाटा येथे गोळा झाले. त्यांनी शासनाचा निषेध नोंदविण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी याही शेतकर्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात पागोटे येथील तीन शेतकरी मारले गेले. ते याच रेल्वे फाटकावर. त्यामुळे शेतकरी आंदोलनातील हे फाटक ऐतिहासिक आहे. याच फाटकावर दरवर्षी 17 जानेवारीला हुतात्मा शेतकर्यांना मानवंदना दिली जाते. मात्र, रेल्वेमार्गामुळे हे फाटक बंद झाले आहे. त्यामुळे गावातील प्रवाशांना नवघर उड्डाणपुलावरून प्रवास करावा लागत आहे.