| मुंबई | वृत्तसंस्था |
राज्याच्या मंत्रीमंडळातील काही लोक एक बाजू, तर काहीजण दुसरी बाजू मांडतात. आरक्षणप्रश्नी कुठल्याही मंत्र्यांमध्ये एकमत नाही. मंत्रीच जाहीरपणे टोकाची भूमिका मांडत असतात. सरकार एका दिशेने जाताना लोकांना दिसत नाही. निधी वाटप आणि विकासकामांवरून सरकारमध्ये मतभेद आहेत. या गोष्टी काळजी काळजी करण्यासारख्या आहेत. महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक प्रश्न मागे राहिले आहेत, मुख्यमंत्र्यांचे कुणावरही लगाम नसल्यानं सरकार दिशाहीन झाले आहे, अशी टीका जयंत पाटलांनी केली.
डेंग्यूमुळे दिवाळीत कार्यकर्त्यांना भेटता येणार नसल्याचे समाजमाध्यमांद्वारे जाहीर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी दीड तास चर्चा केली. यानंतर लवकर अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असल्याचं बोललं जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अमित शाहांना भेटतात, ही चांगली गोष्ट आहे. मला खात्रीय की राज्याच्या हिताचेच प्रश्न अमित शाहांच्यासमोर ते मांडत असतील. राज्यातील ज्वलंत प्रश्न लवकर निकाली काढण्यावर चर्चा केली असेल, तर त्याचं स्वागत करतो.
जयंत पाटील यांना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “शरद पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी कुणाला भेटावं किंवा कुणाला भेटू नाही, या विषयी बोलण्याचा मला कोणताही अधिकार नाही. त्याविषयी मी भाष्य करणंही अपेक्षित नाहीय. तो त्यांच्या कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर भाष्य करु इच्छूक नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.
यावेळी जयंत पाटील यांच्या नाराजीबाबतदेखील प्रश्न विचारण्यात आला. “अजित दादा राज्याचे अर्थमंत्री आहेत. त्यांच्या गटाने तक्रार करणं असं काही कारण असेल, असं मला वाटत नाही. पण त्यांनाच माहिती नेमका तपशील काय? अजित पवार राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांना निधी मिळणार नाही, असं होणार नाही. पण त्यांना शिंदे गटातील मंत्र्यांच्या खात्यातून निधी मिळत नसेल तो त्यांच्या सरकार अंतर्गत प्रश्न आहे. किती आमदारांना किती निधी दिला जातो हा चुकीचा पायंडा सध्या पाडला जातोय. राज्याच्या विकासासाठी किती निधी खर्च झाला आणि कोणता क्षेत्रात झाला, याचं महत्त्व आता कमी झालंय”, असं जयंत पाटील म्हणाले.