रायगडमध्ये 25 हजार रुग्ण
| अलिबाग | प्रतिनिधी |
व्यापक प्रमाणात जनजागृती करूनही कुष्ठरोगांकडे पाहण्याची समाजाची नजर अद्याप बदलेली नाही. यामुळे कुष्ठरुग्णांना अलिप्तपणाचे जीवन जगावे लागते. कुष्ठपीडितांचा प्रश्न गंभीर असून, जगाचा विचार केल्यास जगातील सर्व कुष्ठपीडितांपैकी भारतात 58 टक्के रुग्ण आहेत. यावर नियोजनबद्ध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी नुकतेच अलिबाग येथे कुष्ठरोग निर्मूलनासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण संस्था आणि सहायक संचालक कुष्ठरोग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कोकोनट हॉटेल आयव्ही रिसॉर्टच्या सभागृहात मकुष्ठरोग जनजागृती आणि मानवाधिकारफ या विषयावर आधारित (दि.4) व (दि.5) एप्रिल अशी दोनदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचा शुभारंभ माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. कुष्ठरोग निर्मूलनासाठी वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. त्याचबरोबर रुग्णांना सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून स्वर्गीय बाबा आमटे यांच्यासारख्या आश्रमाची, तर दुसरीकडे शहरासह ग्रामीण भागातील झोपडपट्ट्यांमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे. कुष्ठरोगींच्या झोपडपट्टीत असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी, शौचालये, वीज, पायवाटा, घरांचा दर्जा, शिक्षण, आरोग्य सेवा अशा प्रकारचे अनेक प्रश्न आहेत. अशा झोपडपट्ट्या देशात जवळजवळ 800 असून, झोपडपट्ट्यांमधील प्रश्न अधिक गंभीर आहेत; तर आश्रमांचे प्रश्न वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यांना दिले जाणारे काम, व्यवसायासाठी शिक्षण आणि नोकर्या इत्यादी प्रश्न आहेत. जगातील सर्व कुष्ठपीडितांपैकी भारतात 58 टक्के रुग्ण आहेत. त्यामुळे भारताला कुष्ठरोगाची राजधानी समजले जाते. त्यामुळे देशातील अन्य राज्यांतील कुष्ठपीडितांना एकत्र करून हा प्रश्न आपण दिल्लीच्या व्यासपीठावर नेला; परंतु सध्याच्या अस्थिर परिस्थितीमुळे प्रत्यक्ष या कामास सुरुवातच झाली नसल्याची खंत राम नाईक यांनी यावेळी बोलून दाखविली. याप्रसंगी पनवेल येथील शांतिवन कुष्ठरोग निवारण समितीचे ट्रस्टी उदय ठकार, आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण संस्थेचे कार्यकारी संचालक शरद भोसले, ट्रस्टी आनंद नवाथे, मानद सचिव मिथिला गोखले, सहायक संचालक आरोग्य सेवा विभागाचे अवैद्यकीय पर्यवेक्षक भगवान जाधव, अन्य मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
कुष्ठरोगाचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित गैरसमज, अज्ञान, कुष्ठरोग लपविण्याच्या प्रकारामुळे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधताना आशा वर्कर यांना अडचण येत आहे. रायगड जिल्ह्यात आजाराचे रुग्ण कमी झाले असे वाटत असतानाच, दुसरीकडे उपलब्ध माहितीनुसार सर्व्हेअंती रायगड जिल्ह्यात 25 हजार रुग्ण सापडल्याचे आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निवारण संस्थेचे कार्यकारी संचालक शरद भोसले यांनी सांगितले. सर्व्हेच्या वेळी कुष्ठरोग वस्तीत जाऊन माहिती घेतली असता, त्यांचे अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. तसेच कुष्ठरुग्णांमध्ये दोन प्रकार पाहायला मिळतात. शारीरिकबरोबरच मानसिक आजाराचा त्यात समावेश आहे. या दोन्हीपैकी मानसिक आजार खूप कठीण असून, मानसिक आजारामुळे कुष्ठरोगी खचून जातात, असे शरद भोसले यांनी सांगितले.