| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-चौक राज्यमार्ग रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मिळालेल्या निधीमधून करण्यात येत आहे. प्रचंड रहदारी असलेल्या या रस्त्यावर प्राधिकरणाकडून काँक्रिटीकरणाचे काम सुरु असून नऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम तब्बल 82 कोटींच्या निधीमधून करण्यात येत आहे. मात्र, प्राधिकरणाकडून रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जात असताना वाहनचालकांच्या सुरक्षेची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. त्यामुळे या रस्त्यांते दिवसा देखील प्रवास करणे धोक्याचे झाले आहे.
रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी खोदकाम केली जात आहेत. कधी साकव बांधण्यासाठी तर काही ठिकाणी लहान पुलांचीनिर्मिती करण्यासाठी खोदकाम केले जात आहे. मात्र, या रस्त्याचे काम करताना कोणत्याची प्रकारचे नियोजन नाही, दिशा दर्शक फलक कुठेच आढळून येत नाहीत. पर्यायी रस्त्याची व्यवस्था चांगली नसल्याने येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते.
मुंबईकर शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवसात कर्जतकडे धाव घेत असल्याने या रस्त्यावर वाहनाच्या प्रचंड रांगा लागलेल्या असतात. ज्या रस्त्यावर काम सुरू आहे त्या बाजूने फक्त एक गाडी जाण्या योग्य रस्ता उपलब्ध असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी एक माणूस नेमणे आवश्यक आहे. रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असल्याने पाणी मारणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम बरेच दिवस प्रलंबित असल्याने पावसाळा अखेर रस्ता व्हावा हीच मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. दरम्यान या रस्त्यासाठी किती महिन्याचा टाईम बाँड असेल, किती नक्की काय उपाययोजना असणार आहेत यासाठी एमएमआरडीए उपअभियंता कोरेगावकर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.