नेरळ ग्रा.पं.चा निष्काळजीपणा उघड

उघड्या गटारात पडून नागरिक जखमी

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ ग्रामपंचायतीला नुकतेच आयएसओ मानांकन मिळाले असून, एक महिनाही होत नाही तोच ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नेरळ बाजारपेठेतील उघड्या गटारावर जाळी न बसवल्याने एक जेष्ठ नागरिक त्यात पडून गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात त्या ज्येष्ठ नागरिकाच्या पायाचे हाड तुटले असून, त्यावर रायगड हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. तर या प्रकाराबाबत नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

नेरळ ग्रामपंचायत हद्दीत दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएकडून शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यात आले होते. तर यासह रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटाराचे कामदेखील करण्यात आले होते. त्यावर जाळ्या बसवत पेव्हर ब्लॉक लावण्यात आले नाहीत. नेरळ बाजारपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ असलेले गटार गेले अनेक दिवस उघडे पडले आहे. त्यावर जाळी बसवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. मात्र, त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष दिले नाही. परिणामी, जैन मंदिराचे पुजारी चंपालाल रावल शुक्रवारी सायंकाळी तेथून येथून जात असताना उघड्या गटारात पडले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. ही घटना पाहताच येथील उपस्थित ग्रामस्थ यांनी तत्काळ त्यांना रायगड हॉस्पिटल येथे दाखल केले. तर डॉक्टरांनी त्यांना तपासून पायाला फॅक्चर असल्याचे सांगितले. तर काही दिवसांपूर्वीसुद्धा एक महिला त्याच गटारात पडली होती. सातत्याने हे अपघात होत आहेत मात्र ग्रामपंचायत लक्ष देत नाही ही वस्तूस्थिती आहे. नेरळ ग्रामपंचायतीने त्या ग्रामस्थांना नुकसान भरपाई द्यावी, असे मत सामाजिक कार्यकर्ते संदीप उत्तेकर यांनी व्यक्त केले.

Exit mobile version