। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थ गेले काही दिवसापासून गढूळ पाणी पीत आहेत. त्यामुळे नेरळकरांना साथीच्या आजारांना सामोरे जाण्याची वेळ आली असून पूर्व भागातील रहिवाशांना गढूळ आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने त्यांनी नेरळ ग्रामपंचायत वर मोर्चा देखील नेला होता. दरम्यान, गेली चार महिने नेरळ ग्रामपंचायत हद्दीला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीला पाणीपुरवठा करणारा जलशुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. त्या जलशुद्धीकरण केंद्राचे फिल्टर प्लांट पावसाळ्यापासून बंद असल्याचे सांगण्यात आहे. त्यामुळे पाणी शुद्ध करणारी यंत्रणा बंद पडल्याने उल्हास नदीमधून उचललेले गढूळ पाणी थेट घरोघरी नळाद्वारे पोहचत आहे. त्यामुळे नेरळ नळपाणी योजनेचे पाणी पिणारे यांचे गढूळ पाण्याने हाल केले आहेत. गेली महिनाभर नेरळ मधील डॉक्टरांकडे ताप,सर्दी आणि खोकला या आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत.
नेरळ नळपाणी योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र सुरू आहे, पण अशुद्ध पाणी शुद्ध होत नाही असे दिसून येत असल्याचा आरोप पूर्व भागातील कार्यकर्ते कुमार गोपणे यांनी केला आहे. स्थानिक ग्रामपंचायत सदस्य देखील त्या रहिवाशांची दखल घेत नसल्याने या भागातील स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. कुमार गोपणे यांच्यासह अनेक रहिवासी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये पोहचले होते.