| मुंबई | वृत्तसंस्था |
भारताचा 17 वर्षीय युवा खेळाडू डी. गुकेश याने रविवारी झालेल्या लढतीत हिकारू नाकामुरा याला ड्रॉवर रोखले. याचसोबत इयान नेपोनियात्ची-फॅबियानो कॅरुअना यांच्यामधील लढतीही ड्रॉ राहिली. गुकेशने एकूण नऊ गुणांसह आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी घातली. आता जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या डिंग लिरेन याच्यासमोर गुकेशचे खडतर आव्हान असणार आहे.
डी. गुकेश-हिकारू नाकामुरा यांच्यामध्ये 14व्या फेरीचा सामना रंगला. या फेरीमध्ये गुकेशने पहिल्या चालीपासून नाकामुरावर वर्चस्व गाजवले. त्यामुळे नाकामुराला डोकेवर काढण्याची संधी मिळालीच नाही. याच लढतीदरम्यान फॅबियानो कॅरुअना-इयान नेपोनियात्ची यांच्यामध्येही लढत पार पडली. या लढतीत दोघांपैकी एकाने विजय मिळवला असता तर टायब्रेकरमध्ये स्पर्धेचा विजेता ठरला असता. फॅबियानो याने या लढतीत वरचढ होण्याचा प्रयत्न केला; पण नेपोनियात्ची याने कडवी झुंज दिली. त्यामुळे दोन खेळाडूंमधील लढत ड्रॉ राहिली.
एबासोव, फिरॉझाविरुद्ध विजय महत्त्वाचे डी. गुकेशने आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील 14 फेर्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली; पण गुकेशने 12व्या व 13व्या फेरीत मिळवलेले विजय कलाटणी देणारे ठरले. गुकेशने 12व्या फेरीत निजात एबासोव याला, तर 13व्या फेरीत एलिरेझा फिरॉझा याला पराभूत केले. खरेतर एबासोव व फिरॉझा या दोन्ही खेळाडूंना या स्पर्धेमध्ये चमक दाखवता आली नाही; पण गुणांवर लक्ष देता गुकेशसाठी हे दोन्ही विजय अत्यंत महत्त्वाचे ठरले.
वयाच्यानुसार परिपक्वता जास्त डी. गुकेश हा वयाच्या 12व्या वर्षी ग्रँडमास्टर झाला. आता आव्हानवीरांची स्पर्धा जिंकण्यात त्याला यश मिळाले. यावरूनच बुद्धिबळातील त्याची मेहनत दिसून येते. त्याच्यामध्ये एक लक्षणीय बाब आहे. सध्या तो 17 वर्षांचा आहे. वयाच्या मानाने त्याच्यामध्ये अधिक परिपक्वता आहे. तो शांतचित्ताने बुद्धिबळ खेळावर लक्ष केंद्रित करतो, हीदेखील वाखाणण्याजोगी बाब आहे.
भविष्यात जगज्जेता अन् आव्हानवीर भारतीय असणार भारतात सध्या युवा व गुणवत्ताप्रधान बुद्धिबळपटूंची कमी नाही. आर. प्रज्ञानंद हा कात टाकत आहे. आव्हानवीरांच्या स्पर्धेत त्याच्याकडून छान कामगिरी झाली नाही; पण त्याच्यामध्येही क्षमता आहे. डी. गुकेशने स्वत:ची कल्पकताही दाखवून दिली आहे. अर्जुन एरिगेसीही शर्यतीत आहे. भविष्यात जगज्जेता व आव्हानवीरांच्या स्पर्धेतील जेताही भारतातच असल्यास आश्चर्य वाटणार नाही. याचा अर्थ भारतातील दोन खेळाडूंमध्ये जगज्जेतेपदाची लढत रंगेल.