आता ईव्हीएमवर उमेदवारांचे फोटो

निवडणूक आयोगाचा निर्णय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

गेल्या काही दिवसांपासून देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तसेच या निवडणुकांत केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका हा विषय केंद्रस्थानी आहे. निवडणुकीत मतचोरी झाल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. बिहारमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या व्होट अधिकार यात्रेत याच मुद्द्याला केंद्रस्थांनी ठेवून भाजपा, निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. असे असतानाच आता एकीकडे विरोधकांकडून अनेक आरोप होत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर उमेदवारांचे रंगीत फोटो लावण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने ईव्हीएमबाबत एक नवी गाईडलाईन जारी केली आहे. या नव्या नियमांची अंमलबजावणी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे. या नव्या गाईडलाईन्सनुसार आता ईव्हीएमवर उमेदवारांचे पहिल्यांदाच रंगीत फोटो लावले जाणार आहेत. सोबतच ईव्हीएमवरील अनुक्रमांकही आता आणखी स्पष्ट दिसतील अशी त्यांची रचना केली जाणार आहे.

नेमका निर्णय काय घेण्यात आला?
निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक नियमावली 1961 च्या नियम 49 ब अंतर्गत असलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये संशोधन केले आहे. या संशोधनानुसार आता ईव्हीएमवर निवडणुकीला उभे राहिलेल्या उमेदवारांचे रंगीत फोटो छापले जातील. तसेच फोटोच्या तीन चतुर्थांश भागावर उमेदवाराचा चेहरा असेल. उमेदवार कोणता आहे हे स्पष्टपणे समजावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उमेदवारांचा अनुक्रमांक हा आंतरराष्ट्रीय भारतीय अंकांत असेल. या अंकाच्या फॉन्टचा आकार 30 असेल. हे सर्व अंक बोल्ड फॉन्टमध्ये असतील.
विरोधक काय भूमिका घेणार?
निवडणूक आयोगाच्या या नव्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी लवकरच होऊ घातलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया अधिक स्पष्ट व्हावी तसेच मतदारांना मतदान करताना सर्व उमेदवारांचे फोटो स्पष्टपणे दिसावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता विरोधक या निर्णयावर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

एकरूपता सुनिश्चित करण्यासाठी सर्व उमेदवार, नोटाची नावं एकाच फॉन्ट प्रकार आणि सहज वाचता येईल अशा पुरेशा मोठ्या फॉन्टच्या आकारात छापली जातील. तसेच ईव्हीएम मतपत्रिका 70 जीएसएम कागदावर छापली जातील. विधानसभा निवडणुकीसाठी, आरजीबी मानांकन असणाऱ्या गुलाबी रंगाच्या कागदाचा उपयोग केला जाईल. एकूणच आगामी निवडणुकांमध्ये प्रगत मतपत्रिकेचा वापर केला जाईल, ज्याची सुरुवात बिहार विधानसभा निवडणुकीपासून होणार आहे.
Exit mobile version