पुन्हा एकदा बाळंतपणासाठी झोळीचा आधार

गारमाळ धनगरवाड्यात रस्त्याअभावी ग्रामस्थांची फरफट

| खोपोली | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्यांची समस्या अद्याप कायम असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नंदनपाडा ग्रामपंचायत हद्दीतील गारमाळ धनगरवाडा येथे रस्ता नसल्याने बाळंतपण झालेल्या महिलेला झोळीच्या सहाय्याने घरी न्यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला. दोन महिन्यांपूर्वी उंबरणे आदिवासी वाडीतील महिलेला बाळंतपणासाठी झोळीच्या सहाय्याने आणण्याची घटना घडली होती. त्यानंतर आता गारमाळ धनगरवाड्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गारमाळ धनगरवाड्यात जाण्यासाठी आजही पक्का रस्ता उपलब्ध नसल्याने येथील नागरिकांना दररोज सुमारे अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट होत असून, चिखल, दगड आणि मोठमोठे खड्डे पार करत ग्रामस्थांना वावोशीपर्यंत जावे लागते. त्यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच कामगारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

वनविभागाच्या परवानगीअभावी रस्त्याचे काम रखडले?
गारमाळ ते वावोशी हे सुमारे अडीच किलोमीटरचे अंतर आहे. या रस्त्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाल्याची माहिती असून, वन विभागाची परवानगी मिळालेली नसल्याने रस्त्याचे काम रखडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. मात्र, रस्ता नसल्याचा सर्वाधिक फटका येथील नागरिकांना बसत आहे.
गारमाळ येथे धनगर व आदिवासी समाजाची सुमारे 70 घरे असून, जवळपास 400 नागरिकांची लोकवस्ती आहे. एवढ्या मोठ्या लोकवस्तीला आजही मूलभूत वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
विकासाच्या घोषणा कागदावरच?
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही खालापूर तालुक्यातील गारमाळ धनगरवाड्यापर्यंत रस्ता पोहोचलेला नाही, ही बाब विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात विकासकामांच्या घोषणा होत असताना दुर्गम वाड्या-वस्त्यांपर्यंत अद्याप मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
निवडणुका आल्या की स्थानिक पुढारी आणि राजकीय नेते विकासाची आश्वासने देतात; मात्र निवडणुकीनंतर या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी
रस्त्याअभावी आरोग्यसेवा, शिक्षण, रोजगार आणि दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः गर्भवती महिला किंवा आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्याची वेळ आली तर ग्रामस्थांसमोर मोठे संकट उभे राहते. बाळंतपणानंतर महिलेला झोळीच्या सहाय्याने घरी आणण्याची वेळ येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गारमाळ धनगरवाड्याच्या रस्त्याचा प्रश्न वन विभागाची परवानगी, निधी आणि प्रशासकीय कार्यवाहीच्या माध्यमातून तातडीने मार्गी लावावा. प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Exit mobile version