मारुती विश्वासराव
भारतातील इंग्रज काळातील जुन्या बंदरापैकी एक असलेले मुंबई बंदर आहे. या बंदराची स्थापना 26 जून 1873 साली झाली असून, 26 जून 2022 रोजी मुंबई बंदराने 150 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या बंदराचा थोडक्यात इतिहास असा की, भारताच्या पश्चिम किनार्यावरील सात बेटांचा समूह असलेले मुंबई बेट आहे. 1652 पासून ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरत येथील प्रतिनिधींचा या बेटावर डोळा होता. पण हे बेट भाडे करारावर देण्याच्या त्यांच्या विनंतीना पोर्तुगीजांनी दाद दिली नाही. त्यानंतर नऊ वर्षांनी इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरीन यांच्या विवाहात मुंबई बेट इंग्लंडच्या राजाकडे सुपूर्द करण्यात आले. राजाने हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाडेतत्त्वावर दिले. वर्षाला 10 पौंड किमतीचे सोने द्यावे, असे नाममात्र भाडे आकारले. अशा पद्धतीने 1668 साली मुंबई बंदर आणि सात बेटे ( द्वीपसमूह ) ईस्ट इंडिया कंपनीकडे सोपविण्यात आल्यानंतर व्यापाराची भरभराट व्हावी यासाठी काही पावले उचलण्यात आली. कस्टम हाऊस,गोदामे, सुक्या गोद्या, अशी बांधकामे झाली. मुंबई बंदर हे जगभरातून येणार्या वस्तूंच्या व्यापाराचा केंद्रबिंदू होताच, 1730 साली मुंबईमध्ये जहाज बांधणीचा व्यवसाय सुरू झाला आणि एका नवीन पर्वाची सुरुवात झाली.
ईस्ट इंडिया कंपनीचा अमल 1858 साली संपल्यानंतर मुंबई थेट ब्रिटिश राजघराण्याच्या अधिपत्याखाली आली. 26 जून 1873 साली सध्या अस्तित्वात असलेले स्वायत्त, वैधानिक बॉम्बे पोर्ट ट्रस्ट क्ट कार्यान्वित करून त्याकडे मुंबई बंदराचा प्रशासकीय कारभार सोपविण्यात आला.
1869 साली सुएझ कालवा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबई बंदराच्या सागरी व्यापारामध्ये बरीच क्रांती घडून आली. कारण भारताच्या पूर्व किनार्यावरून चालणारी आयात निर्यात पश्चिम किनार्यावरून होऊ लागली, आणि मुंबई बंदर हे भारताचे प्रवेशद्वार बनले. 1875 साली पहिली गोदी ससून डॉकच्या रूपाने अस्तित्वात आली. त्यानंतर हळूहळू 1880 साली प्रिन्सेस गोदी,1888 मध्ये व्हिक्टोरिया गोदी बांधण्यात आली.त्यानंतर 1914 साली अलेक्झांडरा गोदी ( आताची इंदिरा गोदी ) बांधण्यात आली. मुंबई बंदराच्या उभारणीमुळे एका आधुनिक वैभवशाली व्यापारी बंदराचे आणि त्यावर वाढणार्या मुंबई शहराने रूप धारण केले होते
मुंबई बंदरामुळे मुंबईतील रहिवाश्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही प्राप्त झाला होता. जहाजातील मालाची चढउतार करण्यासाठी त्यावेळी टोळी पद्धत होती. रोजगाराची संधी उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित कामगार मुंबईत येऊ लागले.त्यामुळे मुंबई बंदर आणि मुंबई शहर असा एक सशक्त आर्थिक दुवा तयार झाला.
मुंबई बंदराच्या भरभराटीमुळे कामगारांची संख्या वाढत गेली. जगभरातील गोदी कामगारांनी बंदराच्या आसपासच्या शहरात कामगार चळवळीची पाळेमुळे रोवली होती. मुंबई शहरात 1889 साली कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी मिल हँड्स असोसिएशन ही पहिली कामगार संघटना स्थापन केली, तर मुंबई बंदरातील वर्कशॉपमधील कसबी कामगार सदानंद गडकर व इतर कामगारांनी 3 मे 192े रोजी बी.पी. टी. एम्प्लॉईज युनियन ( आताची मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन) ही मुंबई बंदरातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. 1938 साली ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनची स्थापना झाली. त्यानंतर इतर कामगार संघटनांची स्थापना झाली. जमनादास मेहता, ईश्वरभाई पटेल, अशोक मेहता, डॉ. शांती पटेल, कॉ. जी. एच. काळे, कॉ.पी.डिमेलो, भाई मनोहर कोतवाल, कॉ. एस. आर. कुलकर्णी या बुजुर्ग कामगार नेत्यांनी गोदी कामगारांचे नेतृत्व केले. सध्या ज्येष्ठ कामगार नेते ड. एस. के. शेट्ये, सुधाकर अपराज, विद्याधर राणे, केरसी पारेख, किशोर कोतवाल इत्यादी कामगार नेते गोदी कामगारांचे नेतृत्व करीत आहेत. गोदी कामगारांच्या जबाबदार व दूरदृष्टी नेतृत्वामुळे गोदी कामगारांना चांगली पगारवाढ,पेन्शन व हॉस्पिटल सुविधा मिळते.
भारतातील प्रमुख बंदरापैकी मुंबई बंदर हे अनेक वर्षे प्रथम क्रमांकावर होते. आता चौथ्या क्रमांकावर आहे. प्रमुख बंदरामध्ये पूर्वी 3 लाख गोदी कामगार होते, आज 22 हजार कामगार आहेत. मुंबई बंदरात पूर्वी 40 हजार कामगार होते, आज 4 हजार कामगार आहेत. सर्व बंदरातील पेन्शनरची संख्या 1 लाख 30 हजार असून मुंबई बंदरात 36 पेन्शनर्स आहेत. 1984 पासून मुंबई पोर्टमध्ये कामगार भरती होत नाही.कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चालली आहे, बंदरांच्या खाजगीकरणाला सर्वच कामगार संघटना विरोध करीत आहेत. मुंबई बंदरातील कामगारांची संख्या कमी असली तरी 2021- 22 यावर्षी 59.89 दशलक्ष टन मालाची चढउतार झाली.
मुंबई बंदर 150 वर्षाकडे वाटचाल करीत असताना त्यास अनेक संकटांचा सामना करावा लागला. 1989 साली मुंबई पोर्ट कडून 500 कोटी घेऊन 1200 कोटी रुपये खर्च करून जवळच जे.एन. पी. टी. पोर्ट उदयास आले. त्यामुळे या बंदराचा फटका मुंबई बंदराला बसला. कंटेनरची कामे या बंदरात गेली. आतापर्यंत प्रमुख बंदरांचा कारभार ज्या मेजर पोर्ट क्ट 1963 नुसार चालत होता, आता 3 नोव्हेंबर 2021 पासून मेजर पोर्ट ऑथोरीटी क्ट अमलात आला आहे. पूर्वीच्या कायद्यानुसार डॉ. शांती पटेल, कॉ. एस. आर. कुलकर्णी यांनी 60 वर्षावरून अधिक काळ मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार विश्वस्त म्हणून काम केले, तर अॅड. एस. के. शेट्ये, सुधाकर अपराज आणि केरसी पारेख यांनी आठ वर्षे मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार प्रतिनिधी म्हणून काम केले. आताच्या नवीन कायद्यानुसार नोकरीत असलेले गोदी विभागातील शेड सुप्रिटेडेंट व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे आणि लेखा विभागातील कार्यालयीन अधिक्षिका व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार कल्पना देसाई यांची मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर म्हणून 24 मे 2022 पासून नेमणूक झाली आहे.
मुंबई बंदराकडे 1800 एकर जमीन आहे. या बंदरात आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल, डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल, रो- पॅकस् टर्मिनल, मरिना, शिवडी ते एलिफंटा दरम्यानचा रोप वे, कान्होजी आंगरे बेट पर्यटन स्थळ, कोचीन शिप यार्ड, पिरपाव येथील चौथे केमिकल टर्मिनल, जवाहर द्वीप येथील पाचवे ऑईल टर्मिनल असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. मुंबई पोर्टच्या सेवानिवृत्त कामगारांच्या पेन्शनसाठी 14 हजार कोटी रपयांची आवश्यकता आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सेवानिवृत्त कामगारांसाठी एल.आय.सी. कडे असणार्या पेन्शन फंडात पाच हजार कोटी रुपयांची तूट आहे, तरी मुंबई पोर्ट विकासाच्या येणार्या उत्पन्नातून ही तूट भरून काढणे सहज शक्य आहे. मुंबई पोर्टला 100 वर्षे पूर्ण झाली तेंव्हा कामगार व पोर्टच्या निधीतून शताब्दी स्मारक निधी हा कामगारांसाठी फंड तयार करण्यात आला. यामधून शैक्षणिक कर्ज, चष्मे, अडचणीत असणार्या कामगारांना आर्थिक मदत अशा अनेक योजना राबविल्या जातात. मुंबई पोर्टला 125 वर्षे पूर्ण झाली तेंव्हा टायटनचे मनगटी घड्याळ कामगारांना देण्यात आले होते, आता मुंबई पोर्ट ट्रस्टला 150 वर्षे होत आहेत, या दीडशे वर्षात बंदराच्या विकासात गोदी कामगारांचे व अधिकार्यांचे मोठे योगदान आहे, तेव्हा सध्याच्या आधुनिक युगात उपयुक्त असणारी व दीडशे वर्षाची आठवणीत राहणारी भेटवस्तू म्हणून गोदी कामगारांना, अधिकार्यांना व पेन्शनरना स्मार्ट फोन देण्यात यावा ही माफक अपेक्षा गोदी कामगारांची आहे. मुंबई बंदराला पुन्हा चांगले दिवस येवो, ही सदिच्छा.