पालीकरांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा

। पाली/बेणसे । वार्ताहर ।

महाराष्ट्रातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे नदीचे पाणी गढूळ, चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे प्रदूषित पाणी पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ कधी थांबणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यात तर पाण्याची परिस्थिती अधिक भयानक होते. सरकार बदलले की योजनांच्या अंमलबजावणीवर देखील त्याचा परिणाम होत आहे.

आत्तापर्यंत नळाच्या पाण्यातून साप, बेडूक, शंखशिंपले व मासे आदी आले आहेत. याबरोबरच शेवाळ, चिखल हे नेहमीच येते. आजूबाजूच्या कारखान्यांतून प्रदूषित पाणी देखील नदीमध्ये सोडले जाते. अनेक नागरिक प्रदूषित पाणी पिण्यापेक्षा कूपनलिका व विहीरीचे पाणी, विकतचे बाटलीबंद पाणी पितात. नियमित पाणीपट्टी भरून देखील लोकांना असे प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्तकेला आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रदूषित पाण्यापासून नागरिकांची सुटका करावी, असा सुर नागरिकांमधून उमटत आहे.

शुद्ध नळपाणी योजना लालफितीत

शासनाने केलेल्या 2008 -09 च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व दररोज येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79 लाख रुपयांचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतू राजकीय श्रेयवादामध्ये ही योजना रखडली. त्याबरोबर 10 टक्के लोकवर्गणीचा प्रश्‍नदेखील होता. मात्र पालीला ब वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला. त्यामुळे शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे. सध्यस्थितीत ही योजना 27 कोटींवर गेली आहे.

Exit mobile version