पहिल्याच पावसात रसायनांचा पूर; शेतजमीन, जलस्रोत, नागरिकांच्या जीविताला धोका
| चणेरा | प्रतिनिधी |
धाटाव औद्योगिक वसाहतीत पुन्हा एकदा गंभीर रासायनिक प्रदूषणाचा प्रकार समोर आल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. कंपनीसमोरील सांडपाण्याच्या चेंबरमधून डिझेलसदृश्य रसायनयुक्त दूषित पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे. मुसळधार पावसामुळे चेंबर तुडुंब भरून वाहात असून, हे विषारी पाणी थेट रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणारे कामगार, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या घटना घडतात. अनेक ठिकाणी रसायनमिश्रित पाणी रस्त्यावर, नाल्यांमध्ये आणि शेतांमध्ये वाहून जात असल्याचे वारंवार दिसून येते. त्यामुळे औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सीईटीपी यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.नागरिकांचा आरोप आहे की, काही उद्योग पावसाचा आडोसा घेत रासायनिक सांडपाणी बाहेर सोडतात. त्यामुळे पहिल्या मुसळधार पावसाची काही बेजबाबदार उद्योग वाट पाहात असतात का? असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत महादेवखार (महाळुंगे) हद्दीतील खलाटी परिसरात रासायनिक प्रदूषणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकरी संदीप कांडणेकर, राज जोशी, चंद्रकांत कांबळे, संजय शिंदे आणि भालचंद्र कांबळे हे सकाळी पावसामुळे उगवलेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी शेतात गेले असता, त्यांच्या शेतात पिवळसर रंगाचे रसायनयुक्त पाणी शिरल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या विषारी पाण्याच्या संपर्कामुळे नव्याने उगवलेली पिके अक्षरशः जळून गेली असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता औद्योगिक प्रदूषणाचे नवे संकट कोसळल्याने त्यांच्यासमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी शेतकरी विलास म्हात्रे यांच्या शेततळ्यात रसायनयुक्त पाणी शिरल्याने जिताडा व इतर प्रजातींचे मासे मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आढळले होते. या घटनेमुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही प्रभावी उपाययोजना न झाल्याने प्रदूषणाचा प्रश्न कायम असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, औद्योगिक प्रदूषणामुळे परिसरातील नाले, ओढे आणि जलस्रोत सातत्याने दूषित होत आहेत. अनेक वेळा जलचर मृतावस्थेत आढळल्याच्या घटनांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. दूषित पाण्याचा परिणाम भूजलावरही होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असून, भविष्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो. प्रदूषण नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेल्या यंत्रणा आणि संबंधित विभाग प्रत्यक्षात किती प्रभावीपणे काम करतात, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई होणार की नेहमीप्रमाणे केवळ नोटिसा देऊन प्रकरण दडपले जाणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
दोषींवर कारवाईची मागणी
स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींनी सीईटीपी प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. पर्यावरणाशी खेळ करणाऱ्या उद्योगांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे. जर वेळेत कठोर कारवाई झाली नाही, तर पावसाचा प्रत्येक थेंब प्रदूषण लपविण्याचे साधन ठरेल आणि त्याची किंमत निसर्गासह सर्वसामान्य नागरिकांना चुकवावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.







