पांड्याने केल्या भावना शेअर

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, त्याचे चर्चेत येण्याचे कारण क्रिकेट नसून वैयक्तिक आयुष्य आहे. त्याच्या आणि नताशा स्टॅनकोविकच्या लग्नाबाबत अनेक अफवा आहेत. जवळपास चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघे वेगळे झाल्याचा दावा केला जात आहे. या सगळ्यापासून दूर असलेला हार्दिक पांड्या अमेरिकेत भारतीय संघासाठी घाम गाळत आहे. बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने चांगली तुफानी फटकेबाजी केली. सामन्यानंतर हार्दिकने सांगितले की, तो कठीण काळातून जात आहे.

सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्याने संवाद साधत आपल्या मनातील भावना शेअर केल्या. तो म्हणाला, आयुष्य अनेकदा तुम्हाला कठीण प्रसंगात टाकते. पण मला वाटतं जर तुम्ही खेळ आणि मैदान सोडलं तर तुम्हाला हवं ते मिळणार नाही. हे अवघड आहे पण मी नेहमी करत आलो तेच करत आहे. तो पुढे म्हणाले, या गोष्टी घडतात, कधी चांगला काळ येतो तर कधी वाईट. मी याआधीही अशा प्रसंगातून गेलो आहे आणि मी परतही आलो आहे. मी यशाला फारसे गांभीर्याने घेत नाही. जेंव्हा मी काही चांगलं करतो तेंव्हा मी ते विसरून पुढे जातो. आज कठीण काळातही मी तेच करतो त्या गोष्टीपासून पळत नाही. मी प्रत्येक गोष्टीचा सामना करतो.

Exit mobile version