| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
नको असेल ते द्या, हवं असेल ते न्याया योजने अंतर्गत गोर गरीबांची मदत करण्याच्या हेतूने पालिका प्रशासनाकडून विविध भागात ठेवण्यात आलेल्या काही कपाटानी गरजूंकडे पाठ फिरवली आहे कां असा प्रश्न सध्या या कपाटाची परिस्थिती पाहिली की पडत आहे. चांगल्या हेतूने ठेवण्यात आलेल्या या कपाटाचा वापर काही नागरीक घरातील जुने जीर्ण झालेले कपडे, तुटक्या चपला, बिघडलेले व वापरण्या योग्य नसलेल्या वस्तू आणून टाकण्यासाठी करत असल्याने ही कपाटे म्हणजे भंगार साहित्य टाकण्याची ठिकाण बनली आहेत. पालिका हद्दीत राहणारे गरीब, गरजू आणि बेघर लोकांना मदत व्हावी या हेतूने पनवेल पालिके मार्फत पालिका हद्दीतील विविध भागात नको असेल ते द्या, हवं असेल ते न्या या योजनेच्या नावावर कपाट ठेवण्यात आली आहेत.
या कपाटामध्ये नागरिकांनी आपल्या घरात नको असलेल्या चपला, कपडे, भांडी, पुस्तके आणून ठेवावी असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. पालिकेने सुरु केलेल्या या योजनेचे त्या वेळी कौतुक करत अनेक नागरिकांनी पालिकेच्या या योजनेला चांगला प्रतिसाद देत आपल्या घरातील नको असलेले साहित्य या कपाटामध्ये ठेवण्यास सुरवात केली.या मुळे सुरवातीला या या योजनेचा फायदा अनेक गरजू व्यक्तींना झाला. आता मात्र अनेकजण घरातील टाकावू वस्तू बाहेर काढण्यासाठी या कपाटाचा वापर करत असल्याने अनेक कपाटा भोवती टाकावू वस्तूंचा कचरा जमा झाला असून, काही ठिकाणची कपाटे उलटी करून ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.






