| म्हसळा | प्रतिनिधी |
दिल्ली येथे झालेल्या बॉम्ब ब्लास्टसारख्या देशविघातक घटनांच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी म्हसळा पोलिसांनी शांतता समितीची विशेष बैठक आयोजित केली होती. म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीस म्हसळा तालुक्यातील सर्व समाजांचे अध्यक्ष, पदाधिकारी, गणेश मंडळ प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक तसेच शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिल्लीतील बॉम्ब ब्लास्टमध्ये जीव गमावलेल्या निरपराध नागरिकांना बैठकीच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी समिती सदस्यांनी 1993 च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टची आठवण करून देत सुरक्षा आणि सतर्कतेची गरज पुन्हा अधोरेखित केली. तालुक्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करून महत्त्वाच्या ठिकाणी नाका तपासणी वाढवावी, सतर्क गस्त ठेवावी आणि सीसीटीव्ही यंत्रणेला अधिक बळकटी द्यावी अशी सूचना करण्यात आली. या बैठकीस माजी सभापती महादेव पाटील, उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, मुस्लिम समाज अध्यक्ष महमदअली पेणकर, उपाध्यक्ष मूब्बशीर जमादार, सलीम उकये, हिंदू समाज सचिव सुशिल यादव, नगरसेवक सुफीयान हळदे, सुहेब हळदे, योगेश करडे, सुरेश कुडेकर, बाबू बनकर, समीर काळोखे, सुहेल घराडे, अनिल बसवत, नाना सावंत, किरण पालांडे, सौरव गोरेगावकर, कांतीभाऊ जैन, हेमंत नक्ती, दिपल शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
म्हसळ्यात शांतता समितीची बैठक
