| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील रांजणपाडा येथील गावदेवी मरूआईच्या यात्रेनिमित्त आणि स्वर्गीय बाबीबाई त्रिंबक पाटील यांच्या स्मरणार्थ अष्टगंध कला मंच उरण-नवी मुंबईच्या वतीने (दि.29) एप्रिल रोजी ‘गाव कजा परक्यांची मजा’ हा आगरी बोली भाषेतील नाट्यप्रयोग रांजणपाडा येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात रात्री 9.30 वाजता सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगाला ग्रामीण रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन नाटककार हासूराम पाटील यांनी केले आहे. तर, सहदिग्दर्शन चेतन पाटील यांनी केले आहे. नाटकात हासूराम पाटील, दिगंबर कोळी, प्रसाद कडू, रोशन घरत, नवनीत माळी, कृष्णकांत म्हात्रे, चेतन पाटील, अशोक म्हात्रे, जयकिसन मोकल, बाळ, दत्तात्रेय घरत, रमेश कोळी, वैशाली मोहिते, परिशा सरोदे, रुचिता म्हात्रे आणि प्रफुल्ल आदी कलाकारांनी आपल्या अभिनयातून भूमिका साकारल्या. या नाटकाला आनंद कुबल यांचे संगीत लाभले होते. तर नेपथ्य राजा जोशी, रंगभूषा अमृत म्हात्रे, ध्वनी रामचंद्र पाटील, हरेश पाटील, रंगमंच व्यवस्था संतोष साऊंड सर्विस यांची आहे. ग्रामस्थ मंडळ रांजणपाडा, ड्रीम फाऊंडेशन, स्वराज मित्र मंडळ, जय हनुमान क्रिकेट क्लब या सर्वांचे सौजन्य लाभले. या नाट्य प्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, नाट्य, धार्मिक अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष तथा अष्टगंध कला मंचाचे अध्यक्ष अशोक म्हात्रे, सचिव दत्तात्रेय घरत, मार्गदर्शक हासूराम पाटील, नाटककार धनेश्वर म्हात्रे यांनी केले.