। चंद्रपूर । वृत्तसंस्था ।
चंद्रपूर-मूल मार्गावरच्या अजयपूर येथे पेट्रोल टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
अजयपूर गावाजवळ गुरुवारी (दि. १९) मध्यरात्री हा अपघात झाला. लाकूड घेऊन येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३१ सीक्यू २७७० आणि चंद्रपूरवरून मूलकडे जाणारा डीझेल टँकर क्रमांक एमएच ४० बीजी ४०६० या दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रकला आग लागली. अपघातानंतर टँकरमधील डिझेलमुळे भीषण आगीचा भडका उडाला. ट्रकचे टायर फुटल्याने आग अधिकच पसरली. मूल-चंद्रपूर अग्निशमन पथकाने मोठ्या प्रयत्नांनंतर ही आग विझवली. या आगीत मृत पावलेल्या प्रवाशांचे मृतदेह जळून खाक झाले.
लाकूड भरलेल्या ट्रक मध्ये वाहनचालक ३० वर्षीय अजय सुधाकर डोंगरे (रा. बल्लारपूर), ३३ वर्षीय प्रशांत मनोहर नगराळे, ३० वर्षीय मंगेश प्रल्हाद टिपले, २५ वर्षीय महिपाल परचाके, ४६ वर्षीय बाळकृष्ण तुकाराम तेलंग, ४० वर्षीय साईनाथ बापूजी कोडापे राहणार नवी देहली, २२ वर्षीय संदीप रवींद्र आत्राम रा. तोहोगाव कोठारी हे सर्व मजूर लाकूड उतरविण्यासाठी चंद्रपूरला येत होते. तर डीझेल टँकर मधील वाहनचालक ३५ वर्षीय हनिफ खान रा. अमरावती, कंडक्टर ३५ वर्षीय अजय पाटील वर्धा हे दोघेही ट्रकला लागलेल्या आगीत होरपळून मृत पावले.