ठेकेदाराला मिळणार बिलाची रक्कम, प्रवाशाचा अपघात होण्याची शक्यता
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पेण एसटी स्थानकामध्ये जागोजागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत तसेच काही ठिकाणी या खड्ड्यांनी तळ्याचे स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे स्थानकात अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या खड्डे, चिखल व साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. खड्ड्यांमध्ये पडून प्रवाशाला दुखापत किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच परिस्थिती रामवाडी एसटी स्थानकाची सुद्धा आहे.
प्रत्यक्षात एसटी स्थानकात जागोजागी खड्डे पडलेले असताना ठेकेदाराला मात्र हजारो रुपयांची बिले अदा करण्याची तयारी एसटी महामंडळाने केल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पेण एसटी स्थानकातील खड्डे बुजविण्याचे काम एम. एच. इनामदार या ठेकेदाराला देण्यात आले आहे. सदर कामाकरिता या ठेकेदाराला 96 हजार रुपये अदा करण्याचेे आदेश महामंडळाच्या अधिकार्यांनी दिले आहेत.रामवाडी एसटी स्थानकातील खड्डे बुजविण्याचे काम आतिश कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले असून सदर कामाकरिता या ठेकेदार कंपनीला 93 हजार रुपये अदा करण्याचे आदेश महामंडळाच्या अधिकार्यांनी दिले आहेत.
एस टी महामंडळाचे मुंबई येथील मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या आदेशाने सदरचे बिले आदा करण्यात येतात. सदरच्या कामांची योग्यता तपासण्याचे व परीक्षण करण्याचे कोणतेही अधिकार रायगड विभागीय कार्यालयातील कर्मचार्यांना नसल्याने केवळ बिले अदा करण्याचे काम या कर्मचार्यांना करावे लागते.
यासंदर्भात एसटीच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांच्याशी संपर्क साधला असता सदरच्या ठेकेदारांनी गणपती पूर्वी खडी टाकून खड्डे बुजविल्याचा दावा विभाग नियंत्रकांनी केला.
पेण व रामवाडी येथील एसटी स्थानके नागरी वस्तीत असल्याने येथे साचलेल्या पाण्यामुळे शहरातील नागरिकांनाही आरोग्याच्या समस्या होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या डेंग्यूची साथ असल्याने या साचलेल्या पाण्यामुळे डेंगु, मलेरिया अधिक प्रमाणावर वाढू शकतो. तसेच या दूषित पाण्यामुळे प्रवाशांना व एसटी कर्मचार्यांना त्वचारोग होऊ शकतो.
न बुजवलेले खड्डे, स्थानकात चिखलाचे झालेले साम्राज्य, तसेच साचलेल्या पाण्यामुळे स्थानकाला आलेल्या तळ्याचे स्वरूप यामुळे हजारो प्रवाशांना व एसटी कर्मचार्यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. तरीही ठेकेदारांना मात्र न बुझविलेल्या खड्ड्यांचे हजारो रुपये अदा झाल्यास नक्की कोणाच्या पोटाचा खड्डा भरणार असा प्रश्न संतप्त प्रवासी करीत आहेत.