नवघर उड्डाणपुलावर खड्डे

। उरण । वार्ताहर ।
नवघर उड्डाणपूल हा उरण तालुक्यातील वाहतुकीसाठी महत्वाचा मार्ग आहे. या पूलामुळे पूर्व व पश्‍चिम हे विभाग जोडले जातात. मात्र मागील अनेक महिन्यांपासून नवघर उड्डाणपुलाची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. तर दुसरीकडे पुलावरील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे पुलावर अंधारही पसरला आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे पुलाच्या कडेला व दुभाजकावर आलेली झाडे झुडपे ही वाढली आहेत. या झुडपामुळे वाहनचालकांना समोरील वाहन दिसत नाही. अशा अनेक समस्यांना या उड्डाणपूलावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.

उरण पनवेल राज्य महामार्गावरील फुंडे येथील साकव नादुरुस्त झाल्याने उरण तसेच द्रोणागिरी नोड या औद्योगिक विभागामध्ये ये जा करणारी प्रवासी व जड वाहने याच उड्डाणपुलाचा वापर करीत आहेत. पुलाच्या द्रोणागिरी नोड व उरण पनवेल मार्ग या दोन्ही बाजूने खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्ड्यातील धुळीचाही सामना करावा लावत आहे. खास करून या पुला शेजारीच असलेल्या तुकाराम हरी वाजेकर विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थी याच पुलावरून प्रवास करीत आहेत. त्यामुळे नवघर येथील उड्डाणपुलाची दुरुस्ती त्याचप्रमाणे विजेची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे

Exit mobile version