पनवेल | वार्ताहर |
सध्या उन्हाचा पारा 40 अशांवर पोहोचला आहे. अशातच सायन-पनवेल मार्गावरील मार्बल मार्केटसमोरील तळोजा लिंक रोडवर निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे. परिवहन विभागाच्या दुर्लक्षामुळे भरउन्हातच तासन् तास बसची वाट पाहत उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
सायन-पनवेल महामार्ग नवी मुंबईतील सर्वात जास्त रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. कळंबोली, कामोठे, रोडपाली, खारघर या परिसरातून ठाणे, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी नोकरी धंद्यानिमित्त जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रस्ते वाहतुकीने नोकरीधंद्याच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे सायन-पनवेल महामार्ग महामार्गालगतच्या सर्व बस थांब्यांवर नेहमीच प्रवाशांनी गर्दी असते. परंतु, सायन-पनवेल महामार्गावरील बहुतांश ठिकाणी बस थांबे नाहीत. तर काही ठिकाणी असलेल्या थांब्याची दयनीय अवस्था आहे. त्यामुळे या थांब्यावरील प्रवाशांना अर्ध्या रस्त्यावर येऊन उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लोकप्रतिनिधी उदासीन
सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात बस थांबे आहेत. ज्या ठिकाणी गरज नाही, अशा ठिकाणी राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते बसथांबे बांधताना दिसतात. परंतु, सायन-पनवेल महामार्गावरील तळोजा लिंकरोड लोकवस्तीच्या बाहेर असल्याने कुठल्याही लोकप्रतिनिधीने निवारा शेड वा बस थांबा उभारला नाही.