बसस्थाकविना प्रवाशांचे हाल

रखरखत्या उन्हात उभे राहण्याची वेळ
बसस्थानकाच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे सुसज्ज बसस्थानक व्हावे, अशी मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र, निष्क्रिय प्रशासनाकडून अद्यापही दुर्लक्ष होत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना एसटीची वाट पाहताना रखरखत्या उन्हात चटके सोसावे लागत आहेत. बोर्लीपंचतन शहरात 2021 मध्ये अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे जुन्या बसस्थानक ठिकाणी मोकळ्या भूखंडावर नव्याने बसस्थानक बांधण्यात यावे व आम्हा प्रवाशांना सुविधा मिळावी, अशी मागणी जनसामान्यातून गेली दोन वर्षे होत आहे. परंतु, कोणतेच सोयर सुतक नसलेल्या प्रशासनाला याची झळ आद्याप पोहोचलीच नाही.

बोर्लीपंचतन बसस्थानकाला दिघी विभागातील अनेक गावे तसेच दिवेआगर, हरिहरेश्‍वर, दिघी-जंजिरा अशी पर्यटनस्थळे एसटी वाहतुकीने जोडली गेली आहेत. येथे दिवसातून येणार्‍या-जाणार्‍या 74 गाड्यांची नोंद होत असून मुंबई, पुणे शहारांसह गाव खेड्यातील नागरिक प्रवास करीत आहेत. मात्र, याच गांभीर्य एसटी प्रशासनाला नसून, अल्प उत्पन्नामुळे महामंडळ तोट्यात ही बोंब कायम आहे.

बोर्लीपंचतन हे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असून, शेकडो विद्यार्थी व प्रवासी भरउन्हात बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे राहात असल्याने पालकवर्गातून चिंता होत आहे. सोबतच विद्यार्थ्यांना गरजेचे एसटी पास, अधिकार्‍याची नेमणूक नसल्याने चौकशीसाठी मिळणारी माहिती उपलब्ध होत नाही. यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे महामंडळाचा सर्व कारभार वार्‍यावर आहे. गेली दोन वर्षे होत असलेली बसस्थानकाची मागणी अजूनपर्यंत पूर्ण झाली नसल्याने येथील नागरिक तथा प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत.

प्रशासनाकडून दुर्लक्ष
अधिक माहितीसाठी पेण विभाग तसेच श्रीवर्धन आगारप्रमुख यांच्याकडे संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे आमच्याकडे माहिती नाही असे उत्तर मिळत आहे. त्यामुळे या समस्येकडे महामंडळाच्या जबाबदार अधिकार्‍यांकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडूनदेखील दुर्लक्ष केलं जात आहे.

Exit mobile version