अवकाळी पावसाने फोडले प्रशासनाचे बिंग
। वावोशी । वार्ताहर ।
खालापूर तालुक्यातील वावोशी फाटा ते परखंदे धनगरवाडी हा रस्ता अंत्यत धोकादायक असून नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानंतर त्याची स्थिती अक्षरशः विदारक बनली आहे. रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये आता पाणी भरून डबके तयार झाले असून, नागरिकांना खड्डे चुकवायचे की पाणी टाळायचे, असा प्रश्न पडला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तब्बल पावणे दोन कोटींचा निधी मिळूनसुद्धा या रस्त्याचे काम अपूर्णावस्थेतच राहिले आहे. 2019 पासून सुरु असलेले हे काम आजही कागदावरच दिसून येत आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरण झाले होते, त्याठिकाणी देखील आता खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने या ढिसाळ कामाचे भांडे फोडले आहे. त्यामुळे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा भयानक परिस्थितीमुळे स्थानिक नागरीकांच्या संतप्त भावना उमटत आहेत. इतका निधी मिळूनसुद्धा रस्ता पूर्ण न होणे म्हणजे सरळसरळ निधीचा अपव्यय आणि हलगर्जीपणाचे प्रतीक आहे, असे संतप्त नागरिकांमधून बोलले जात आहे. त्याचबरोबर खड्ड्यांमध्ये भरलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना कसरत कसरत करावी लागत आहे. तर, शाळकरी मुलांसह वृद्धांची तारांबळ उडत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, आमदार, खासदारही गेल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. परंतु, त्यांनाही या रस्त्याच्या वेदना जाणवल्या नाहीत, हेच अधिक संतापजनक असल्याचे बोलले जात आहे.