प्रा. अशोक ढगे
देशात आता निवडणुकीचं रण खर्या अर्थाने तापलं आहे. या रणधुमाळीत उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोव्यातल्या राजकीय कुरघोड्या जवळून पहायला मिळत आहेत. यातून देशाचं प्रातिनिधीक राजकीय चित्र पहायला मिळत आहे. प्रचार जसजसा पुढे जात आहे, तसतशी राजकीय पक्षांमधली चढाओढ जवळून अनुभवायला मिळणार आहे. आजच्या राजकीय संस्कृतीची ही झलक बरंच काही सांगून जाणारी आहे.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये एक एक टप्पे एव्हाना पार पडू लागले आहेत. आता रण खर्या अर्थाने तापलं आहे. या रणधुमाळीत उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोव्यातल्या राजकीय साठमारीतल्या राजकीय कुरघोड्या जवळून पहायला मिळत आहेत. यातून देशाचं प्रातिनिधीक राजकीय चित्र पहायला मिळत आहे. प्रचार जसजसा पुढे जात आहे, तसतशी राजकीय पक्षांमधली चढाओढ जवळून अनुभवायला मिळणार आहे. मात्र आजच्या राजकीय संस्कृतीची ही झलक बरंच काही सांगून जाणारी आहे.
अलिकडेच एका व्हर्च्युअल रॅलीमध्ये, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू, सुनील जाखर यांच्यासह अन्य अनेकजण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असताना चन्नी यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणं ही काँग्रेसची अपरिहार्यता होती. याचं कारण विविध पाहण्यांमधल्या निष्कर्षांमध्ये मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांना सर्वाधिक पसंती होती. त्याचबरोबर दलित-शीख मतांचं कार्ड त्यामागे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू होता. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी मुख्य स्पर्धा चन्नी आणि सिद्धू यांच्यात होती. गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी काँग्रेसमध्येच दबाव होता. शिवाय अनेक नावं चर्चेत होती. काँग्रेसचा पंजाबमधला जवळचा स्पर्धक असलेल्या आम आदमी पक्षाने खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर राहुल यांनी सर्व अटकळींना पूर्णविराम देत चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं. राहुल यांनी सिद्धू यांच्यापेक्षा चन्नी यांना पसंती का दिली, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रदेश काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल यांच्याकडे चन्नी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. राज्यात काँग्रेससाठी चन्नी हे एकमेव पात्र उमेदवार होते. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून दुसर्याला घोषित केलं असतं तर निवडणुकीपूर्वी पक्षासाठी ती आत्महत्या ठरली असती. पक्षाने सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं असतं तर जनतेची इच्छा डावलली गेली असती, असं काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी सांगितलं. शिवाय सिद्धू यांना पक्षातल्या काही नेत्यांचा विरोध होता. त्यांचा लहरी स्वभाव हे ही एक कारण होतं. काही महिन्यांपूर्वी चन्नी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती; पण लवकरच त्यांनी आपल्या स्वच्छ प्रतिमेद्वारे आणि झटपट घोषणांच्या माध्यमातून सर्वांना मागे टाकलं आणि राज्यात लोकप्रिय झाले. कॅ. अमरिंदर सिंग यांनी पक्ष सोडल्यानंतर राहुल यांच्यासमोर दुसरा पर्याय उरला नव्हता. सिद्धू यांनीही यापूर्वी पंजाबच्या समस्या सोडवण्याबाबत घोषणा करण्याच्या उद्देशाने प्रामाणिक प्रयत्न केले; पण त्यांचा अहंकार मार्गातला मोठा धोंडा ठरला. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं की काही महिन्यांपूर्वी मी सिद्धूंसोबत होतो, पण त्यांची वृत्ती स्वत:पुरतं पाहण्याची आहे. ते आमच्याबद्दल कधीच बोलत नाहीत. त्यामुळे सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करणं काँग्रेससाठी नुकसानकारक ठरलं असतं. श्री. चन्नी यांची स्वच्छ प्रतिमा, ही त्यांची भक्कम बाजू आहे. आजपर्यंत कोणीही सिद्धू यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केलेली नाही. सर्व ठिकाणांहून चन्नी यांच्याच नावाचा आग्रह होतो. राजकारण आणि निवडणुका सामूहिक प्रयत्नाने होतात; पण सिद्धू स्वप्रतिमेच्या विळख्यात होते.
चन्नी यांची सर्वात जमेची बाजू म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि दलित असणं. पंजाबमधली 32.5 टक्के दलित लोकसंख्येला आकर्षित करण्याची यापेक्षा चांगली संधी काँग्रेसला मिळू शकली नसती. याशिवाय त्यांच्या अनेक योजना लोकांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. ‘गरीब घर कार्ड’चं खूप कौतुक होत आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितलं की लोकांच्या मनस्थितीनुसार काँग्रेसकडे चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्याशिवाय पर्याय नव्हता.
एकीकडे राजकीय अपरिहार्यता पहायला मिळत असताना दुसरीकडे उत्तरप्रदेशची सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पाहणारे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव अंधश्रद्धा सोडायला तयार नाहीत, असं पहायला मिळालं. अखिलेश अजूनही नोएडाला अशुभ मानतात. अखिलेश यांनी गेल्या 11 वर्षांपासून नोएडाच्या भूमीवर पाऊल ठेवलेलं नाही. 2012 ते 2017 या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते एकदाही नोएडात आले नाहीत. अलिकडेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांचा ताफा रात्री 11 वाजता ग्रेटर नोएडाच्या लुहाली (दादरी) टोल प्लाझावर पोहोचला; मात्र त्यांनी या भूमीवर पाय ठेवला नाही. ते गाडीतून खाली उतरलेच नाहीत. पाऊस असूनही समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते टोल प्लाझावर अनेक तास अखिलेश यांची वाट पाहत होते. 11 वर्षांनंतर अखिलेश यांचं आगमन होताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केलं; मात्र अखिलेश गाडीतून खालीही उतरले नाहीत. समाजवादी पक्षाच्या प्रमुखांनी आपल्या गाडीची खिडकी उघडली, हात हलवला आणि दिल्लीला निघून गेले. अखिलेश खाली येऊन भेटतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती; मात्र तसं झालं नाही.
असं मानलं जातं की जो कोणी नोएडाला भेट देतो, त्याची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची अडचणीत येते, त्याला मुख्यमंत्रिपद हुलकावणी देतं. 1980 पासून असं पाच वेळा घडलं आहे, जेव्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी नोएडाला भेट देऊन आपली जागा गमावली.
अखिलेश यांचाही या मुद्द्यावर विश्वास आहे. त्यामुळेच सरकार गेल्यानंतरही त्यांनी नोएडात पाऊल ठेवलं नाही. एन. डी. तिवारी 1980 मध्ये नोएडाला आले आणि मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमावली. त्याचप्रमाणे वीर बहादूर सिंग यांनी त्यांची खुर्ची गमावल्यानंतर काही दिवसांनी 1988 मध्ये नोएडाला भेट दिली होती. 1995 मध्ये मुलायम सिंग, 1997 मध्ये मायावती आणि 1999 मध्ये कल्याण सिंग यांच्याबाबतही असंच घडलं. 2011 मध्ये मायावती नोएडामध्ये आल्या आणि 2012 मध्ये सत्तेतून बाहेर पडल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा या अंधश्रद्धेवर विश्वास नाही.
आपल्या कार्यकाळात ते 20 हून अधिक वेळा नोएडाला गेले. मेट्रोचं उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री योगी 23 डिसेंबर 2017 रोजी नोएडा येथे गेले होते. या बैठकीत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएडाच्या निमित्ताने अखिलेश यांना अंधश्रध्दा म्हटलं होतं. 25 डिसेंबर 2017 रोजी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, आज मला आनंद आहे की, नोएडाबद्दल चुकीची प्रतिमा तयार केली गेली आहे. इथे कोणताही मुख्यमंत्री येऊ शकत नाही, हा चुकीचा समज आहे. योगीजींनी आपल्या आचरणाने ती खोटी असल्याचं सिद्ध केलं. आधुनिक युगात असं काही होऊ शकत नाही.
दरम्यान, प्रचारकाळात काही गमतीही पहायला मिळत आहेत. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना काँग्रेसने पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात स्टार प्रचारक बनवलं आहे. ते ना सरकारमध्ये आहेत, ना संघटनेत. त्यांनी एकदा पक्षाविरुद्ध बंडही केलं आहे. तरी पायलट यांना स्टार प्रचारक का केलं, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे. यामागे राजकीय आडाखे आहेत. पायलट यांना स्टार प्रचारक बनवण्याकडे काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा राजकीय संदेश म्हणून पाहिलं जात आहे. पायलट यांनी उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये जाऊन काँग्रेससाठी पूर्ण ताकद पणाला लावली. अशा स्थितीत भविष्यात राजस्थानमध्ये गेहलोत यांची जागा घेणारे ते सर्वात शक्तिशाली नेते असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या राज्यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अशा अनेक नेत्यांची नावं आहेत; पण त्यांची सक्रियता शून्य आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेस पक्षाला जवळून ओळखणारे रशीद किडवई म्हणतात की सचिन पायलट हे उत्तम वक्ते आहेत. तरुण आणि महिला मतदारांमध्ये त्यांची वेगळी क्रेझ आहे. त्यांनी आसाम, केरळमध्येही पक्षाचा प्रचार केला होता. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांच्यासारखा दुसरा नेता नाही. जून 2021 मध्ये, राजस्थानमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी गेहलोत आणि पायलट गट आमनेसामने होते. अशा स्थितीत स्पष्टीकरण देण्यासाठी प्रदेश प्रभारी अजय माकन आले. श्री. पायलट ही एक शक्ती असल्याचं माकन यांनी म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना तेव्हा सांभाळून घेतलं गेलं आणि आताही स्टार प्रचारक म्हटलं जात आहे.