| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. सरासरी 87 टक्के मतदानाची नोंद झाली असून गेली काही दिवस निवडणूक होत असलेल्या ठिकाणी शाब्दिक चकमकी आणि काही ठिकाणी हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त होता. त्यामुळे शांततेत मतदान झाले. नसरापूर,वदप,गौरकामत,खांडस, ओलमन,नांदगाव आणि आंभेरपाडा य ग्रामपंचायतीमधील उमेदवरांचे राजकीय भवितव्य नतदजान यंत्रात बंद झाले. वदप आणि गौरकामत अशा तीन ठिकाणी मिळून कर्जत पोलिसांनी सहा अधिकारी, 26 पोलीस कर्मचारी आणि काही होमगार्ड तैनात केले होते. नसरापूर ग्रामपंचायतमधील चांदई येथे दुपारी तब्बल 83 टक्के मतदान झाले होते.तर गौरकामत ग्रामपंचायतमध्ये प्रभाग एकमध्ये दुपारी एकपर्यंत फक्त 10 टक्के मतदान झाले होते.
सर्वाधिक चुरस असलेल्या खांडस,नांदगाव,अंभेर पाडा आणि ओळमान या चार ग्रामपंचायतमध्ये राजकीय पक्षांनी जोरदार रंगत आणली होती. त्यामुळे नेरळ पोलिसांनी नेरळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांना खास बाब म्हणून पाचारण केले होते. त्यांच्याशिवाय अन्य नऊ पोलिस अधिकारी तसेच 32 पोलिस कर्मचारी आणि 15 होमगार्ड यांची मदत घेतली. त्यामुळे किरकोळ बाचाबाची वगळता मतदान तणावपूर्ण पण शांततेत झाले. या ठिकाणी पोलिसांकडून मतदार वगळता अन्य कोणालाही मतदान केंद्राजवळ येऊ दिले नव्हते.
सर्व सात ग्रामपंचायतमध्ये सरासरी 87 टक्के मतदानाची नोंद झाली असून अंतिम आकडेवारी अद्याप प्रशासनाकडून देण्यात आली नाही. सात ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच पदासाठी 21 उमेदवार यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून दुसरीकडे 62 सदस्य निवडण्यात निवडणुक रिंगणात असलेले 154 उमेदवार यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता कर्जत तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
सुधागडात स्थलांतरित मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
पाली : सुधागड तालुक्यात 12 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि.05) मतदान पार पडले. यावेळी मुंबई, ठाणे, पुणे व इतर शहरांत कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या मतदारांनी येऊन मतदानाचा हक्क बजावला. याबरोबरच अनेक नव मतदारांनीही मतदान केले. त्यांच्यामध्ये उत्साह पाहायला मिळाला.
गोमाशी, महागाव व दहीगाव या ग्रामपंचायतमधून सरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाला असल्याने या तिन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे बिनविरोध झाले आहे. सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी होती. अनेक मतदार मतदान करून जात होते. बहुतांश ठिकाणी दुपारी 12 नंतर 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. कार्यकर्त्यांची मतदारांना आणण्याची लगबग सुरू होती. शहरातील मतदार आदल्या दिवशीच आपल्या गावी दाखल झाले होते. काहींनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजाबला व शहराकडे परतले, तर काही दुपारून मतदान केंद्रावर गेले. या मतदारांना आणण्याची व सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती. मतदानानिमित्त गावी आल्याने नातेवाईक व मित्रमंडळींच्या गाठीभेटी देखील झाल्या. नवमतदारांमध्ये कुतूहल व उत्साह पाहायला मिळाला. पहिल्यांदा मतदान केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पहायला मिळाला.
वडखळ, वाशी, बोरी, दुष्मी ग्रामपंचायतींमध्ये प्रस्तापितांना धोका
| पेण | वार्ताहर |
तालुक्यातील 11 पैकी 7 ग्रामपंचायतीमध्ये खरी चुरस पहायला मिळणार होती. कारण निम्म्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये भाजप विरुध्द भाजपच लढाई आहे. परंतु 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारी नुसार सर्व ग्रामपंचायती मिळून 71.63 टक्के मतदान झाले. यामध्ये स्त्रीयांची आकडेवारी जास्त आहे.
मतदान मोठयाप्रमाणात होते त्यावेळेला प्रस्थापितांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो, असा राजकीय कयास लावला जातो. त्याचप्रमाणे वडखळमध्ये शिवानी म्हात्रे विरुध्द पुजा मोकल, वाशीमध्ये संदेश ठाकूर विरुध्द अशोक म्हात्रे, बोरीमध्ये नंदिनी म्हात्रे विरुध्द अश्विनी म्हात्रे, दुष्मीमध्ये नेत्रा घरत विरुध्द रश्मी भगत या लढतीत असणाऱ्या मा. सरपंचांच्या पॅनलला मतदारांनी नकारल्याचे चित्र दिसत आहे. असे असले तरी जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत या चारही ग्रामपंचायतीचे भवितव्य वर्तविणे सोपे नाही. दिव ग्रामपंचायतीमध्ये विवेक म्हात्रेंच्या नेतृत्वाच्या पॅनलचे पारडे जड आहे, परंतु पनवेल वरुन आलेली निधी आणि भाजप पक्ष फंड याचा विचार करता विवेक म्हात्रे यांना डोकेदुखी झाल्याचे चित्र आहे. तरणखोप ग्रामपंचायतमध्ये कपातले बशीत आणि बशीतले कपात असा वाद असला तरी येथील ही लढत निकिता पाटील आणि दर्शना पाटील यांची काटे की टक्कर असेल. तर बळवली ग्रामपंचायत निर्वावाद सुकन्या पाटील बाजी मारतील असा एकंदरीत मतदारांचा कल दिसत आहे. पण पेण तालुक्यातील एकूण मतदानाची टक्केवारी पाहता प्रस्थापितांना धोका निर्माण होईल एवढे निश्चित.
ग्रामीण भागातील मतदारांचा उत्साह शिगेला
| महाड | वार्ताहर |
तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी झालेल्या मतदानामध्ये ग्रामीण भागात मतदार संख्या कमी असली तरी उत्साह मोठा होता. राज्यातील गटातटांच्या राजकारणामुळे तसेच सरपंचपदाची निवडणूक थेट होत असल्याने ग्रामपंचायतींच्या निवडणूकांना विधानसभा निवडणुकी इतकेच महत्त्व असल्याचे चित्र प्रत्येक मतदान केंद्रावर रविवारी दिसून आले. सोमवारी बंडखोर, निष्ठावंतांना मतदारांकडून उत्तरे मिळणार असल्याने सर्वच पक्षांचे निकालाकडे लक्ष लागले आहे.
महाड तालुक्यामध्ये 21 ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित 13 ग्रामपंचायतींसाठी 38 मतदान केंद्रांवर रविवारी मतदान झाले. ग्रामीण भागातील मतदान केंद्र लोकवस्तीपासून दूर असली तरी वाड्या-पाड्यांतून केंद्रावर येणाऱ्या मतदारांची मोठी गर्दी दिसून येत होती. सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्साह अधिक होता. तालुक्यातील बावळे, चांढवे बु, किंजळोली खुर्द, काचले, कोतुर्डे, नांदगाव खुर्द, नेराव, रावढळ, शेल, तळोशी, तेलंगे, तेलंगे मोहल्ला व टोळ बु. या ग्रामपंचायतमध्ये मतदान झाले. ग्रामीण भागात रिक्षा किंवा अन्य वाहतुकीचे साधन नसल्याने अनेक मतदार चालतच केंद्रावर येत होते. तालुक्याची तत्कालीन सरपंचांसह 166 उमेदवार निवडणूक लढवत असून कोतुर्डे व तेलंगे मोहल्ला येथे प्रत्येकी 21 उमेदवार रिंगणात असल्याने याकडे प्रमुख कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.
सरपंचपदाची निवडणूक थेट होत असल्याने तरुण मतदारांचा विशेष उत्साह दिसून आला. गावातील कार्यकर्ते आपल्या बुथवर ठिय्या मांडून बसले होते.
महाड तालुक्यात बहुतांशी ठिकाणी शिंदे गटाविरोधात ठाकरे गट अशी लढत आहे. मतदान केंद्र ही दुर्गम भागात आहेत. या ठिकाणी कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता निवडणूक यंत्रणेकडून विशेष काळजी घेण्यात आली होती.
पनवेलमध्ये 407 उमेदवारांच्या भवितव्याचा आज निकाल
पनवेल : तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. रविवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झालेल्या मतदानासाठी केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या. या वेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विचुंबे येथे दिव्यांग, वृद्ध तसेच रुग्णांना मतदान केंद्रांवर आणण्यासाठी व्हीलचेअरची सुविधा नसल्याने उचलून बुथवर न्यावे लागल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. उमेदवाराच्या मतांची बेरीज व टक्का वाढवण्यासाठी कार्यकर्ते उत्साहात अशा मतदारांना मतदान केंद्रांवर नेत होते.
17 ग्रामपंचायतींमध्ये दापोली, चिखले, विचुंबे, ओवळे, भिंगार, वावेघर, कोण, गुळसुंदे व वाघिवली या नऊ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढत पाहायला मिळाली. उर्वरित दुंदरे, देवद, सोमाटणे, गिरवले, कसळखंड, न्हावे व तुराडे या ग्रामपंचायतींमध्ये तिरंगी, चौरंगी लढत आहे. एकट्या मालडुंगेमधून सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात उभे आहेत. थेट सरपंचपदासाठी होत असलेल्या निवडणुकीमुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
मुरुड 15 ग्रामपंचायतीसाठी 61 टक्के मतदान
![](http://krushival.in/grygrars/2023/11/PHOTO-EKADARA-MATADAN-768x1024.jpg)
आगरदांडा ः मुरुड तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीसाठी रविवारी 61 टक्के मतदान झाले आहे. 145 सदस्यपदाकरिता 278 उमेदवार, तर 13 सरपंच पदाकरीता 36 उमेदवार रिंगणात उभे आहेत. मतदारांसह उमेदवारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. तालुक्यामधील आगरदांडा ग्रामपंचायतमध्ये 960 मतदान झाले. राजपुरीमध्ये 2104, शिघ्रेमध्ये 1347, विहुरमध्ये 1173, नांदगावमध्ये 1694, चोरढेमध्ये 1366, वळकेमध्ये 1847, मिठेखारमध्ये 1495, बोर्लीमध्ये 1962, मांडलामध्ये 909, तळेखारमध्ये 915, काशिदमध्ये 1023, भोईघरमध्ये 1180, साळावमध्ये 1099, एकदरा ग्रामपंचायतमध्ये 1152 मतदान झाले. या निवडणुकीकरिता 33142 मतदान असुन 16484 पुरुष तर 16658 स्त्री मतदार आहेत. पैकी पुरुष 9778 तर 10448 स्त्रीयांनी आपला हक्क बजावला. यावेळी प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, एकदरा ग्रामपंचायत निवडणूकीकरिता प्रभाक क्रमांक 2 मधुन पार्वती चंद्रकांत पाटील या दुष्टीहिन महिलेनी आपला मतदान हक्क बजावला.
मोर्बा ग्रामपंचायतीवर इंडिया आघाडीचाच झेंडा फडकणार: शेकाप नेते अस्लम राऊत
माणगाव : तालुक्यातील मोर्बा ग्रामपंचायतीवर सहा वेळा शेकापचा लालबावटा फडकला आहे. येथील जनता हि शेकापला मानणारी आहे. आता राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार इंडिया आघाडीच्या माध्यमातून मोर्बा ग्रामपंचायतीची लढवली आहे. मोर्बा ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का देत सरपंच पदाचे आघाडीचे उमेदवार शाहीद राऊत हे दणदणीत मतांनी निवडून येऊन आमचे सदस्य पदाचे उमेदवारही चांगल्या मतांनी निवडून येतील आणि मोर्बा ग्रामपंचायतीवर इंडिया आघाडीचाच झेंडा फडकणार, असा विश्वास मोर्बा येथील शेकापचे निष्ठावंत जेष्ठ कार्यकर्ते अस्लम राऊत यांनी व्यक्त केला.
30 ते 35 वर्षाच्या राजकारणात आपली जनतेशी नाळ जुळलेली आहे. गोरगरीब जनतेच्या हाकेला आपण रात्री-अपरात्री धावून जातो, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असल्याने येथील जनतेचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहिले आहेत. प्रत्येक निवडणुकीत या विभागातील जनतेने आम्हाला साथ दिली आहे, असे राऊत यांनी सांगितले.
विरोधी पक्षाचे लोक फक्त निवडणुका आल्या की त्यांच्याकडे जातात हे सुज्ञ मतदारांना माहित आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे हे जातीयवादी पक्षाच्या सत्तेत सहभागी झाल्याने मोर्बा गावातील जनतेमध्ये त्यांच्याबद्दल मोठी नाराजी पसरली आहे. हा नाराजीचा सूर पाहता ज्या मताधिक्यानी आमचे उमेदवार निवडून येतात त्यापेक्षा जास्त मताधिक्याने यावेळी निवडून येतील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
उरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शांततेत मतदान
![](http://krushival.in/grygrars/2023/11/PHOTO-URAN-MATADAN-1024x580.jpg)
उरण : तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या चिरनेर, दिघोडे व जासई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर रविवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. चिरनेर, दिघोडे व जासई या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इंडिया आघाडी विरोधात भाजपा असा सामना आहे. चिरनेर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी 2 तर 14 सदस्य पदासाठी 28 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उभे आहेत. दिघोडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी 4 तर 9 सदस्य पदासाठी 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. जासई ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी 3 आणि 17 सदस्य पदासाठी 34 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले. सोमवारी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
तहसीलदारांच्या मध्यस्तीनंतर ग्रामस्थांनी केले मतदान
म्हसळा : तालुक्यातील कोळवट ग्रामपंचायत निवणुकीत मतदान न करण्याचा निर्णय रातीवणे ग्रामस्थानी घेतला होता, मात्र तहसिलदार समीर घारे यांनी मध्यस्ती केल्यानंतर मतदान करण्याचा निर्णय घेतला. मतदान न करण्याबाबतचे निवेदन रातीवणे ग्रामस्थांनी तहसीलदार आणी गटविकास अधिकारी यांना दिले होते. मात्र तहसीलदार समीर घारे, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी डी. एन. दिघीकर, मंडळ अधिकारी गणेश उभारे, तलाठी कळंबे यांनी रातीवणे गावात जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करून मतदानावरील बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. निवडणूक झाल्यानंतर गावातील जलजीवन योजनेचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन घेतल्यानंतर ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रविवारी 5 नोव्हेंबर 2023 रोजी कोळवट ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले. ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्यकेल्याबद्दल तहसीलदार घारे यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.