भास्कर खंडागळे
हवामानबदलामुळे जंगलातली आग, चक्रीवादळ आणि पुराच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्याबद्दल बरेचजण खेद व्यक्त करतात. जीवाश्म इंधन वापरून प्रदूषण करणार्या कंपन्यांना रोखणं कठीण आहे, असं मानलं जातं. सरकार त्यावर नियंत्रण ठेवणार नाही आणि उत्सर्जन कमी करण्याचं लक्ष्य कधीही पूर्ण होणार नाही; परंतु वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्न करुन मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करता येणं शक्य आहे.
हरितगृह वायूंचं उत्सर्जन कमी करण्याबरोबरच प्रदूषण कमी करण्यात छोट्या छोट्या गोष्टींचा मोठा वाटा असतो. सरकार काय करेल, केव्हा करेल याची वाट पाहत बसण्यापेक्षा वैयक्तिक आणि सामूहिकरीत्या छोट्या छोट्या गोष्टी आचरणात आणल्या तर बरंच काही साध्य करता येईल. जागतिक तापमानाला उत्तेजन देणार्या हरितगृह वायूंचं उत्सर्जन मर्यादित करण्यासाठी आपण वैयक्तिकरित्या आणि नंतर सामूहिकपणे अनेक गोष्टी करू शकतो. रस्त्यावरील वाहतुकीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक कार्बनमुक्त करण्यासाठी उत्सर्जन कमी करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे पेट्रोलवर चालणार्या कारऐवजी ट्रेन, सायकली, ई-वाहनं वापरणं आणि शक्य तितकं चालणं म्हणजे सर्वात शून्य-उत्सर्जन वाहतूक. शहरांमध्ये, ई-स्कूटर्सपासून ई-बसपर्यंत इलेक्ट्रिक वाहतुकीचे पर्याय आहेत आणि ते एका गंतव्य स्थानापासून दुसर्या गंतव्य स्थानापर्यंत कमी उत्सर्जन मार्ग तयार करतात. पेट्रोल कार इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा दहापट जास्त कार्बन उत्सर्जित करते. त्यात कचर्याचं उत्पादन आणि विल्हेवाट लावण्याशी संबंधित उत्सर्जनाचाही समावेश होतो. जगातली सुमारे दहा टक्के लोकसंख्या कधीही विमानाने प्रवास करत नाही. विमानाऐवजी ट्रेनने प्रवास केल्यानेदेखील मोठा परिणाम होऊ शकतो. युरोपमधल्या शहरांमधला सामान्य ट्रेन प्रवास समान अंतराच्या विमान प्रवासाच्या तुलनेत 90 टक्के कमी कार्बन उत्सर्जित करतो. जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाच्या 15 टक्के उत्सर्जनासाठी मांस आणि दुग्धजन्य पदार्थ जबाबदार आहेत. जैव विविधता नष्ट होणं, माती दूषित होणं आणि प्रदूषण वेगळं आहे.
‘ग्लोबल वॉर्मिंग’ कमी करण्यासाठी 2030 पर्यंत उत्सर्जन निम्मं करणं आवश्यक आहे, असं हवामान बदलावरील आंतरराष्ट्रीय पॅनेलने (आयपीसीसी) या वर्षी सांगितलं तेव्हा त्यामध्ये वनस्पती प्रथिनं जास्त असलेल्या आणि मांस आणि दुग्धजन्य पदार्थ नसलेल्या आहारांमध्ये हरितगृह उत्सर्जन कमी करण्याची सर्वात मोठी क्षमता आहे, असं आढळलं. त्यामुळे शाकाहाराला प्राधान्य देणं हा हवामानबदलाचा प्रभाव कमी करण्याचा एक मार्ग असू शकतो. आज खाण्यात येणार्या वनस्पतींमुळे केवळ दोन टक्के प्रथिनं वापरली जातात. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या मते, 2035 पर्यंत हे प्रमाण 11 टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. आपल्यापैकी बहुतेकांनी मांस आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी कमी केली तर ते आणखी जलद होईल. ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ या चळवळीत सहभागी झालेल्या शाळकरी मुलांनी हवामानासाठी सामूहिक कृती करणं शक्य असल्याचं दाखवून दिलं. राजकारणी याबाबत काही करत नसतील तर त्यांनाही आता प्रदूषण कमी करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी दबाव आणावा लागेल.
अलीकडेच ऑस्ट्रेलियामध्ये नव्या पिढीच्या नेत्यांनी हवामानबदलाला आळा घालण्यासाठी धोरण राबवण्याचं ठरवलं आहे. सरकारांना पर्यावरणाबाबतच्या जबाबदारीची आठवण करून द्यावी लागेल. पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्गचा ‘फ्रायडे फॉर द फ्यूचर’ गट तिच्या मागण्या सरकारकडे मांडत आहे. एप्रिल 2021 मध्ये ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ मोहिमेच्या तरुणांनी जर्मनीमधल्या उच्च न्यायालयात असा युक्तिवाद केला की, प्रदूषण कमी करण्याबाबतच्या कारवाईच्या अभावामुळे त्यांचं मूलभूत स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. परिणामी, न्यायालयाने सरकारला उत्सर्जन कमी करण्याचं लक्ष्य मजबूत करण्यास भाग पाडलं. दोन महिन्यांनंतर सरकारला न्यायालयाच्या आदेशाचं पालन करावं लागलं. नव्या पिढीमध्ये हवामानाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे तरुणाईची अनेक आंदोलनं, सोशल मीडिया प्रचार किंवा स्थानिक प्रतिनिधींना पत्र देऊन राजकारण्यांवर दबाव आणत आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये हवामान आदेशाबाबत नागरी मोहीम सुरू आहे. 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटीची मागणी ही चांगली सुरुवात आहे. ऊर्जेसाठी जीवाश्म इंधन जाळणं हा जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. पवन ऊर्जा किंवा सौर ऊर्जा यासारख्या स्वच्छ, नूतनीकरणीय स्त्रोतांकडून हरित ऊर्जा मिळवणं हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे हवामानाचा नाश करणार्या कार्बनचा मुख्य स्त्रोत नष्ट होऊ शकतो.
2019 पासून युरोपीयन महासंघात 2005 च्या तुलनेत अक्षय ऊर्जा निर्मिती दुप्पट झाली आहे. एकूण वापरापैकी 34 टक्के वीज त्यातून येते. याचा अर्थ युरोपीयन महासंघाला लागणार्या विजेपैकी कोळशापासून तयार होणार्या विजेचं प्रमाण कमी झालं आहे. कोळशाच्या उत्सर्जनात सर्वात मोठा वाटा हा जीवाश्म इंधनाचा आहे. अमेरिकेत राहणारे लोक आपल्या घराच्या छतावर किंवा शक्य असेल तिथे गॅस हीटिंगच्या बदल्यात इलेक्ट्रिक हीट पंप किंवा सौर ऊर्जा वापरायला लागले आहेत. काही समुदाय केवळ सभोवतालच्या अक्षय उर्जेवर अवलंबून राहण्यासाठी एकत्र येत आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे जर्मनी ऊर्जा संकटाशी झगडत आहे. त्यावर उपाय म्हणून जर्मन सरकार या हिवाळ्यात सरकारी इमारतींमधलं तापमान 19 अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणार आहे. अक्षय ऊर्जेचा वापर मोठे बदल आणू शकतो. दक्षिण जर्मनीमधलं फ्रीबर्ग शहर ‘सोलर सिटी’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. रात्रीच्या वेळी संगणक बंद करणं आणि वापर बंद असलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणं अनप्लग करणं हीदेखील एक हवामानबदल प्रतिबंधक क्रिया आहे. खोलीत कुणी नसताना दिवे बंद करणं सहजशक्य आहे. उच्च ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर (जसं की गॅस स्टोव्हऐवजी इंडक्शन) हेदेखील एक पुढचं पाऊल आहे. स्मारकं आणि इमारतींमध्ये रात्रभर जळणारे दिवे बंद करण्याची कृतीही हवामानबदलाला रोखू शकणारं एक पाऊल आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये नुकतंच हे धोरण लागू करण्यात आलं आहे.
जगातलं एक तृतीयांश अन्न फेकलं जातं. उत्पादन, वाहतूक आणि वापराचं मोजमाप केल्यास अन्न आणि कचर्याचं नुकसान हे प्रचंड कार्बन उत्सर्जित करणारं आहे. कचर्याच्या ढिगार्यात टाकलेल्या अन्नातून मिथेन हा हरितगृह वायू तयार होतो. त्यामुळे अल्पावधीत मोठं नुकसान होतं. अमेरिकेत वार्षिक अन्नाची हानी आणि अन्न कचर्यामुळे 170 दशलक्ष मेट्रिक टन कार्बन डाय ऑक्साईडच्या समतुल्य हरितगृह वायूचं उत्सर्जन होतं. ते कोळशावर चालणार्या 42 वीज प्रकल्पांच्या वार्षिक उत्सर्जनाच्या समतुल्य आहे. फ्रीजमध्ये ठेवलेली प्रत्येक गोष्ट आपण खाऊ शकत नाही. ती किमान कंपोस्टमध्ये टाकली, तर त्याचं खत होऊन परसबाग फुलवता येईल. सुपर मार्केटमधलं जास्तीचं अन्न फेकून देऊ नका. ते फूड बँक किंवा धर्मादाय संस्थांना देऊन टाका. रेस्टॉरंटमध्ये न खाल्लेल्या अन्नासाठी ‘डॉगी बॅग’ देण्यास सांगा. या दोन्ही उपायांचा स्पेनमध्ये नुकत्याच पारित झालेल्या अन्न कचरा कायद्यात समावेश करण्यात आला आहे.
अन्न कचरा पर्यावरणासाठी घातक आहे. अन्नाची नासाडी थांबवणं सर्वात महत्त्वाचं आहे. जंगलं मोठ्या प्रमाणावर तोडली जात आहेत. उदाहरणार्थ, अॅमेझॉनच्या जंगलतोडीत गेल्या वर्षी 20 टक्क्यांनी वाढ झाली. प्रदूषण कमी करून वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी झा़डांची लागवड करून जोपासना करणं अतिशय आवश्यक आहे. पूर्वीपेक्षा आता जास्त झाडं लावणं म्हणजे वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करणं. झाडं हवा स्वच्छ करतात, जैव विविधता वाढवतात आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतात; शिवाय ती ऊर्जा वाचवतात. हे विशेषत: अशा शहरांमध्ये दिसून येतं, जिथे रस्त्यांवरील अधिकाधिक झाडं थंडपणा आणतात आणि वातानुकूलित यंत्रणा वापरण्याची गरज कमी करतात. हा कार्बन मुक्त ना नफा उपक्रम आहे. त्याचप्रमाणे हिवाळ्यात, झाडं विंडप्रूफ निवारा घरं म्हणून काम करतात. त्यामुळे हीटिंगचा खर्च 25 टक्क्यांपर्यंत कमी होतो. कोरोनाशी संबंधित निर्बंधांमध्ये दोन वर्षं घालवल्यानंतर, आता लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले आहेत. त्यामुळेही पर्यावरणाचं नुकसान होतं. त्यामुळे कार्बन फूटप्रिंट छोटा ठेवून प्रवास कसा करायचा ते शिकलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या उपायांनी आपण कार्बन उत्सर्जनाला आळा घालू शकतो.