रिक्षा चालकांची उपोषणाची तयारी
। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळमधील उल्हास नदीवरील दहिवली पूल ते कोदीवले गावापर्यंतचा रस्ता खड्ड्यात हरवला आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनविला जाणार अशी चर्चा आहे. मात्र, या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे स्थानिक रिक्षाचालकांनी तात्काळ रस्त्यावरील खड्डे भरण्याची मागणी केली आहे. दरम्यान, सिमेंट काँक्रिटीचा रस्ता कराल तेव्हा करा, मात्र त्याआधी रस्त्यावरील खड्डे भरा अशी, मागणी जय मल्हार रिक्षा संघटनेने केली आहे.
नेरळ-कळंब राज्यमार्गावर असलेल्या दहिवली पुलापासून कोदीवले गावापर्यंतचा रस्ता मागील पाच वर्षात एकदाही डांबरीकरण करण्यात आलेला नाही. या रस्त्यावरील नेरळ ग्रामपंचायत मधील 200 मीटर आणि कोल्हारे ग्रामपंचायतीतील 1 किलोमीटर लांबीचा रस्ता मागील वर्षी काँक्रीटीकरण करण्यात आला होता. धामोते गावाच्या पुलापासून पुढे कळंबकडे जाणारा रस्ता हा डांबरी आहे. त्यातील कोंदीवले गावापासून पुढे कळंब पर्यंतचा रस्ता गतवर्षी डांबरीकरण करण्यात आला होता. त्यामुळे त्या भागातील रस्ता सुस्थितीत आहे. मात्र, कोंदीवले गावापासून नेरळकडे जाणार्या रस्त्यावर दहिवली पुलापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब आहे. रस्त्यावरील डांबर मागील काही वर्षातील पावसाच्या पाण्यात वाहून गेले आहे. त्यामुळे त्या भागातील रस्त्यावर खड्ड्यांची मालिका दिसून येत आहे. येथील जय मल्हार रिक्षा संघटनेच्या तीनचाकी रिक्षा या रस्त्यावरुन प्रवासी वाहतूक करत असतात. त्यांच्या रिक्षा या खड्ड्यांत आदळत असल्याने प्रवासी बसायला तयार होत नाहीत. त्यामुळे खराब झालेल्या डांबरी रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने करावीत, अन्यथा उपोषणाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा या रिक्षा संघटनेने दिलेला आहे.
निदान खड्डे तरी बुंजवा
कोंदीवले ते दहिवली पूल या रस्त्यावरील खड्ड्यांतून वाट काढणे दुचाकींसह तीन व चारचाकी आणि अवजड वाहनांसाठी देखील त्रासदायक ठरत आहे. या खड्ड्यांमुळे वाहने चालविणे कठीण होऊन बसले आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार असल्याची चर्चा आहे. परंतु, हा रस्ता ज्यावेळी मंजूर होईल त्यावेळी रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरु होईल. त्याला आणखी मोठा कालावधी लागेल. तोपर्यंत नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागेल. त्यामुळे काँक्रीटीकरण जेव्हा कराल तेव्हा करा, त्याआधी निदान रस्त्यावरील खड्डे तरी बुंजवा, अशी मागणी प्रवासी वर्गासह रिक्षा संघटनेकडून होत आहे.
रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे आमच्या रिक्षांमध्ये प्रवासी बसायला तयार होत नाहीत. दहिवली पूलापासून ते कोंदीवलेपर्यंतच्या रस्त्यावर रिक्षा अथवा कोणतेही वाहन सावधपणे चालविले तरी या खड्ड्यात गाडी आदळतेच. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक वाहनचालकांची गैरसोय दूर करण्यासाठी पावसाळ्याआधी रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे करावीत. नाहीतर रस्त्याची अवस्था अजूनही बिकट होईल. त्याचा मोठा परिणाम प्रवासी वाहन चालकांच्या उदरनिर्वाह हाईल.
भगवान जामघरे,
अध्यक्ष, जय मल्हार रिक्षा चालक-मालक संघटना