। आगरदांडा । प्रतिनिधी ।
जीवनात यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी अथक परिश्रमाने अभ्यास करून यश प्राप्त करून गुणवत्तेची कास धरावी, जेणेकरून जीवनात आपल्याला उचित ध्येय गाठता येईल, असे प्रतिपादन महाविद्यालय विकास समिती सदस्य तथा माजी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी केले आहे. कोकण उन्नती मित्र मंडळ वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सभागृहात शैक्षणिक वर्ष 2023-24 मुंबई विद्यापीठाची पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 150 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्याला काय नवीन करता येईल त्यावर लक्ष केंद्रित करून विविध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून यशाला गवसणी घालावी. मोबाईलमध्ये न राहता जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, जेणेकरून भविष्यात आपण ही बिरुदेव डोने सारखे आयपीएस अधिकारी बनु शकता, असे ही ते म्हणाले.
महाविद्यालय विकास समिती सदस्य वासंती उमरोटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, गेले तीन वर्षे सतत अभ्यास केल्याची पोच पावती म्हणून तुम्हाला पदवी प्रदान होणार आहे. हाच विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. बॅ.ए.आर. अंतुले यांनी मुरुड शहरात महाविद्यालय काढल्यामुळे शहरासह पंचक्रोशी भागातील असंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन पदवी प्राप्त करुन आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. तुम्ही देखील आज पदवी प्राप्त करणार आहात. तरी पुढील शिक्षण प्राप्त करून चांगले यश संपादन करा, असे आवाहन वासंती उमरोटकर विद्यार्थ्यांना केले आहे. यावेळी प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, परिक्षा विभाग प्रमुख डॉ. सुभाष म्हात्रे, महाविद्यालय विकास समिती सदस्य सुभाष महाडिक, महाविद्यालय विकास समिती सदस्य वासंती उमरोटकर, डॉ. श्रीशैल बहिरगुडे, डॉ. मुरलीधर गायकवाड, डॉ. सीमा नाहिद, प्राध्यापक सिध्देश सतविडकर, डॉ. नारायण बागुल, मोहिद हसवारे आदिंसह विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते.