खराब रस्त्यामुळे एसटी बंद; विद्यार्थ्यांचे हाल
। नेरळ । प्रतिनिधी ।
तालुक्यातील महत्वाचा समाजाल्या जाणार्या कळंब-पाषाणे-वांगणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यापूर्वीच्या ठेकेदाराने रस्त्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे केल्यामुळेे अल्पवधीत हा रस्ता खराब झाला आहे.दरम्यान, खराब रस्त्यामुळे कर्जत आगाराच्या एसटी बंद झाल्या आहेत. परिणामी विद्यार्थी आणि नोकरदार यांचे प्रचंड हाल होत असून आधी रस्त्याची डागडुगी करावी अशी मागणी साळोख गावाचे रहिवाशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अनिस बुबेरे यांनी केली आहे.
कर्जत तालुक्यातील कळंब भागातील रहिवाशी यांना वांगणी रेल्वे स्थानकात पोहोचण्यासाठी जवळचा असलेला हा रस्ता खराब झाला आहे. मागील दहा वर्षात तब्बल दोनवेळा रस्त्याचे डांबरीकरण करताना येथील पाईप मोरीकडे पाहायला बांधकाम विभागाला वेळ मिळाला नाही. पावसामुळे त्या मोरीला भगदाड आणि खराब रस्ता यामुळे एसटी गाड्यांची वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे कळंब भागातील रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार यांना वांगणी येथे उपनगरीय लोकल पकडण्यासाठी जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. या त्रासाबद्दी येथील गावातील ग्रामस्थ माजी सरपंच जयवंत वेहेले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि रायगड जिल्हा परिषद यांना कळविले आहे. पण बांधकाम विभाग या रस्त्याकडे लक्ष देताना दिसत नाही.