व्यंकटेश प्रसादकडून खरडपट्टी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताने आपल्या वृत्तीत आणि दृष्टीकोनात बदल करून मोठे यश मिळवण्यासाठी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. पैसा आणि पॉवर असूनही आपल्याला छोट्या-मोठ्या यशात समाधान मानायची सवय लागली आहे. आपण एक चॅम्पियन टीम बनण्याच्या खूप दूर आहोत. सर्वच संघ जिंकणाऱ्यासाठीच खेळत असतात. भारतीय संघदेखील जिंकण्यासाठीच खेळता. मात्र, कालानुरूप त्यांचा दृष्टीकोन आणि वृत्ती खराब कामगिरीला कारणीभूत आहे, अशा शब्दात खरडपट्टी काढत व्यंकटेश प्रसादने भारतीय संघाचे कान उपटले.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन एकदिवसीये सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने झाले आहे. पहिला सामना भारताने जिंकला खरा, मात्र विंडीजने त्याही सामन्यात 115 धावांचं आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचे 5 फलंदाज गारद केले. दुसऱ्या सामन्यात तर विंडीजने भारतीय संघाच्या सर्व मर्यादा उघड्या पाडल्या. भारताचा 6 गडी राखून पराभव करत विंडीजने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. भारताच्या या पराभवानंतर टीम माजी खेळाडूंनी टीम इंडियाची चांगलीच खरडपट्टी केली. व्यंकटेश प्रसादने तर टीम इंडियाला बोचऱ्या शब्दात झापलं. तो म्हणाला की, ‘कसोटी क्रिकेटचा अपवाद वगळता इतर दोन फॉरमॅटमधील टीम इंडियाची कामगिरी ही अत्यंत सुमारच राहिली आहे.’