। महाड । प्रतिनिधी ।
महाड शहरालगत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील हॉटेल विसावासमोर असलेल्या रस्त्याची पूर्ण दुरावस्था झाली असून महामार्गाच्या कामाकरीता वापरण्यांत येत असलेल्या माती वाहतुकीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेंत. डंपरमधून मातीची वाहतूक केली जात असताना माती रस्त्यावर सांडते आणि पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर चिखल होऊन अपघात घडत आहेत. महाड नगरपालिका प्रशासनाने याची दखल घेतली असून संबंधितांवर कारवाई करण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यांत आली. दिर्घकाळ सुरु असलेले मुंबई गोवा महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने होत असताना पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात असताना दुर्लक्ष करण्यांत येते,त्याचबरोबर महामार्गाच्या कामामध्ये नियमांचे देखील उल्लंघन होते. परंतु स्थानिक प्रशासनाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यांत येते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाड शहरांत प्रवेश करण्यासाठी असलेल्या शेडाव नाका ते नवेनगर या रस्त्यावरुन मातीची वाहतूक केली जात आहे.अवजड वाहनांतून मातीची वाहतूक करताना माती रस्त्यावर सांडून चिखल होतो. त्याचबरोबर अवजड वाहनांची वाहतूक दिवस-रात्र होत असल्याने रस्त्याची देखील दुरावस्था झाली आहे. वास्तविक शहरांत येण्याकरीता हा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावर खाजगी वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणांत होत असल्याने नादुरुस्त रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण यामार्गावर अधिक वाढले असून यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. महाड महसुल विभागाकडून माती उत्खनन करण्याला ज्या वेळी परवाना देते त्यावेळी शासनाच्या नियमांप्रमाणे उत्खनन करण्याचे बंधन घालण्यांत येते, मातीची वाहतूक करताना प्लास्टिक अथवा ताडपत्रीचा वापर करण्याची सक्ती घालण्यांत आलेली आहे परंतु या महत्वाच्या नियमांचे उल्लंघन करुन मातीची वाहतूक करण्यांत येत आहे. रस्त्याच्या भरावाकरीता वापरण्यांत येत असलेली माती सावित्री नदीच्या पात्रांतून काढली जाते आणि या मातीची वाहतूक नगरपालिकेच्या रस्त्यावरुन केली जाते. वास्तविक पालिका प्रशासनाने रस्त्याची दुरावस्था होण्यास महामार्गावरील काम करणारे ठेकेदार जबाबदार असताना पालिकेच्या नोटीसीला देखील केराची टोपली दाखविण्यापर्यत संबंधितांची मजल गेली आहे. मातीची वाहतूक आणि त्यामुळे होणारा शारिरिक त्रासामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी पालिका प्रशासनाकडून करण्यांत आली आहे.